दहिवडी दुसऱ्या दिवशीही ‘लॉकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:57 IST2021-02-23T04:57:33+5:302021-02-23T04:57:33+5:30
दहिवडी : दहिवडी शहरात कोरोनाचा वाढता कहर पाहून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दहिवडी नगरपंचायतीने शनिवारपासून ...

दहिवडी दुसऱ्या दिवशीही ‘लॉकडाऊन’
दहिवडी : दहिवडी शहरात कोरोनाचा वाढता कहर पाहून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दहिवडी नगरपंचायतीने शनिवारपासून लॉकडाऊन जाहीर केला होता. दुसऱ्या दिवशीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार ठप्प होते.
मागील काही दिवसांत शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. तसेच तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे स्थानिक प्रशासन तसेच तालुका प्रशासनाची तारांबळ उडाली होती. शहरातील आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या ४१७ असून ३६२ रुग्ण बरे झाले आहेत, तर जानेवारीपासून अखेर ९६ रुग्ण कोरोनाचे आढळून आले आहेत. त्यापैकी ३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, रविवारी पुन्हा नव्याने नऊजणांचे अहवाल बाधित आल्याने आणखी आकडा वाढणार आहे. नगरपंचायत प्रशासनाने पोलिसांच्या सहकाऱ्याने वारंवार कडक भूमिका घेत नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळेच जिल्ह्यात सर्वाधिक ५ लाख ६० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. मात्र, नागरिकांचा निष्काळजीपणा व नियम मोडण्याची वृत्ती कमी होताना दिसत नाही. त्याचाच दुष्परिणाम म्हणून मागील काही दिवसांत शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष धनाजी जाधव यांनी विविध विभागांच्या बैठका घेतल्या. लाॅकडाऊनपूर्वी व्यापारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका यांच्या बैठका घेतल्या. अंगणवाडी कर्मचारी व आशा सेविका यांना संपूर्ण शहराचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व व्यापाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
या बैठकीत ठरल्यानुसार त्याचा दुसरा दिवस आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, बाहेर पडताना मास्कचा वापर करावा व सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहनही केले आहे.
चौकट
आजचा आठवडी बाजार बंद
माण तालुक्यात सर्वांत जास्त कोरोना रुग्ण दहिवडीत सापडत असून दिवाळीनंतर जिल्ह्यात एकमेव दहिवडीमध्ये तीन दिवसांचा लाॅकडाऊन पाळला आहे. सोमवारचा आठवडी बाजार बंद असल्याने बाहेरील लोकांनी शहरामध्ये येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
नागरिकांनी बेफिकीर वागू नये, विनाकारण गर्दी करू नये. दहीवडीची झळ तालुक्याला बसू शकते. त्यामुळे दहिवडी तीन दिवस व्यापाऱ्यांनी स्वतः बंद ठेवली आहे. या काळात शहरातील जास्तीत जास्त सर्व्हे करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य खाते साखळी तोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये.
- धनाजी जाधव,
नगराध्यक्ष, दहिवडी
फोटो
दहिवडीत रविवारी दुसऱ्या दिवशीही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळला. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. (छाया : नवनाथ जगदाळे)
फोटो---दिवाळीनंतर सातारा जिल्ह्यात दहिवडी या शहरात पहिले लॉकडाऊन असून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली. त्यामुळे दहिवडीत शुकशुकाट होता.