दहिवडीची बाजारपेठ अर्धवेळ उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:36 IST2021-03-07T04:36:21+5:302021-03-07T04:36:21+5:30
दहिवडी : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे त्रिशतक गाठलेल्या दहिवडीमध्ये गेल्या तीन दिवसात कोरोनाचा वेग मंदावला असून, सलग सोळा दिवसांच्या लॉकडाऊननंतर ...

दहिवडीची बाजारपेठ अर्धवेळ उघडणार
दहिवडी : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे त्रिशतक गाठलेल्या दहिवडीमध्ये गेल्या तीन दिवसात कोरोनाचा वेग मंदावला असून, सलग सोळा दिवसांच्या लॉकडाऊननंतर सोमवारी दहिवडी शहर अर्धवेळ उघडण्यास माण-खटावचे प्रांताधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने दहिवडीकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
येथील दुकाने सोमवारपासून सकाळी ११ ते ४ यावेळेत उघडली जाणार आहेत. प्रशासनाकडून वेळेचे निर्बंध घालण्यात आले असून, सर्व ती खबरदारी घेऊन दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवारचा आठवडा बाजार मात्र बंद राहणार आहे. पहिल्या टप्प्यात दहिवडीत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात दहिवडी शहर हाॅटस्पाॅट बनले होते.
फेब्रुवारी महिन्यात २००पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण होते. सुरुवातीला २० फेब्रुवारीपासून २२ फेब्रुवारीपर्यंत तीन दिवसांचे लॉकडाऊन होते. त्यानंतर ते दहा दिवसांनी वाढविण्यात आले. त्यानंतर संपूर्ण शहराचे एकाचवेळी रॅपिड सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये १५,९१७ लोकसंख्या असलेली जवळपास ३,००० कुटुंब व शासकीय कार्यालये यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी १५० जणांनी काम केले. दहिवडी शहरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. लक्ष्मण कोडलकर, डाॅ. हेमंत जगदाळे, डाॅ. मयुरी शेळके, डाॅ. विनायक कुलकर्णी, डाॅ. सुनील काशीद यांनी नियोजनबद्ध आखणी केली. वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, आशा, अंगणवाडी सेविका यांची २८ पथके ८ सुपरवायझर मोबाईल व्हॅनसह अद्ययावत केली होती. याकाळात जवळपास १,३०० चाचण्या करण्यात आल्या. व्यापारी, दुकानदार, ज्येष्ठ नागरिक तसेच ज्यांना ताप, खोकला, सर्दी असेल अशा लोकांसाठी सिद्धनाथ मंदिर, चावडी चौक, आंधळी पुनर्वसन शाळा, सावरकर स्मरणिका याठिकाणी तपासणी करण्याची सोय केली होती. त्यामुळे याकाळात वेळीच उपचार मिळाल्याने एकही रुग्ण दगावला नाही. गेल्या तीन दिवसात अवघे सातजण पाॅझिटिव्ह आल्याने कोरोना वाढीचा वेग मंदावल्यामुळेच सोमवारपासून सर्व व्यवहार बंधने पाळत सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
कोट..
सोमवारपासून सकाळी ११ ते ४ यावेळेत दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली असून, शेतकऱ्यांची सुगी लक्षात घेता त्यांच्या मागणीवरून सकाळी ९ ते ५ अशी दुकानांना परवानगी मिळावी, यासाठी आम्ही आग्रही असून, प्रांताधिकारी यांच्याकडे तशी मागणी करणार आहे.
- धनाजी जाधव, नगराध्यक्ष, दहिवडी