‘वर्दी’साठी गर्दी!
By Admin | Updated: June 7, 2014 00:04 IST2014-06-07T00:03:42+5:302014-06-07T00:04:17+5:30
पोलीस भरती : हजारो अर्जांमधून जनतेच्या रक्षकांची निवडप्रक्रिया सुरू

‘वर्दी’साठी गर्दी!
सातारा : पोलिसी गणवेश अंगावर चढवून जनतेची सेवा करण्याची ऊर्मी असणाऱ्या हजारो युवकांमधून जनतेचे रक्षक निवडण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारी उत्साही वातावरणात प्रारंंभ झाला. पोलीस दलात भरती होण्याची आकांक्षा घेऊन हजारो तरुण पोलीस कवायत मैदानात उपस्थित झाले होते. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची प्रारंभिक चाचणी शुक्रवारी घेण्यात आली.
पोलीस दलात तीनशे जागा भरावयाच्या असून, त्यासाठीची भरती प्रक्रिया शुक्रवारी सकाळी सुरू झाली. तीनशे जागांसाठी तब्बल ९ हजार ३८९ जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी दीड हजार उमेदवारांना पहिल्या दिवशी मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. सकाळपासूनच पोलीस कवायत मैदानाचा परिसर तरुणांच्या गर्दीने फुलून गेला होता. भरती प्रक्रिया सुरू असताना पोलीस कवायत मैदानात उमेदवारांव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश करू दिला जात नाही. त्यामुळे परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसेच ३४ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, सहायक फौजदारांची टीम २५० पोलीस कर्मचाऱ्यांसह मैदानावर उपस्थित होती.
प्रत्येक मैदानी चाचणीसाठी स्वतंत्र गट करण्यात आले होते. प्रत्येक गटासाठी काही अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. उमेदवारांची प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्यात छाती फुगवून आणि न फुगवता, तसेच उंची, वजन आदी बाबी तपासण्यात आल्या. त्यानंतर मैदानी चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांचे एकंदर चार प्रकार होते. या चाचण्यांमध्ये दीड हजारपैकी ७१८ जण पात्र ठरले आहेत. कागदपत्रांची पूर्तता आणि शारीरिक तसेच मैदानी चाचणीत २१९ उमेदवार अपात्र ठरले.
दरम्यान, शुक्रवारी पात्र ठरलेल्या ७१८ उमेदवारांची पाच किलोमीटर धावण्याची चाचणी शनिवारी घेतली जाणार आहे. तसेच यादीतील पुढील दीड हजार जणांना प्राथमिक शारीरिक आणि मैदानी चाचणीसाठी शनिवारी बोलाविण्यात आले आहे. ही भरतीप्रक्रिया सुमारे दहा ते बारा दिवस चालण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून, पोलीस दलात करिअर करण्यासाठी अनेक युवक आशा लावून बसले आहेत. (प्रतिनिधी)