संचारबंदी आदेशभंग प्रकरणी हॉटेलचालकांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:37 IST2021-03-28T04:37:29+5:302021-03-28T04:37:29+5:30
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोन हॉटेल मालकांविरुद्ध शिरवळ ...

संचारबंदी आदेशभंग प्रकरणी हॉटेलचालकांवर गुन्हा
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोन हॉटेल मालकांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ हद्दीमध्ये शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश वळवी, पोलीस हवालदार नवनाथ कोळेकर हे रात्रगस्त करीत असताना महामार्गालगत असणारे हॉटेल वेलकम बिर्याणी हाऊस हे बारा वाजण्याच्या दरम्यान विनाकारण सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी हॉटेलमध्ये ४ ते ५ व्यक्ती जेवण करीत होते.
यावेळी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी रात्रीच्या दरम्यान जारी केलेल्या संचारबंदीचा हॉटेल मालक विशाल मोहन गायकवाड याने भंग केल्याचे निदर्शनास आले. हॉटेल मालक विशाल गायकवाड याच्याविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महामार्गालगत असणाऱ्या एका वडापाव सेंटरलगत असणाऱ्या हॉटेल मराठी बाणा विनाकारण सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने हॉटेल मालक कौशल राजेंद्र देशमुख (वय २१, रा. फुलमळा, शिरवळ ता. खंडाळा) याच्याविरुद्ध जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार नवनाथ कोळेकर यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली आहे. या घटनेचा सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश वळवी तपास करीत आहेत.