आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करा

By Admin | Updated: November 25, 2015 23:58 IST2015-11-25T23:58:10+5:302015-11-25T23:58:10+5:30

अश्विन मुदगल : मुकाबल्यासाठी सज्ज राहण्याचे अधिकाऱ्यांना केले आवाहन

Create Disaster Management Plan | आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करा

आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करा

सातारा : ‘आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा प्रत्येक विभागाने तयार करून येणाऱ्या आपत्तीच्या मुकाबल्यासाठी सज्ज राहावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने येथील नियोजन भवनमध्ये ‘वातावरणातील बदल आणि आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर उद्बोधन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी, नगर पालिकांचे जिल्हा प्रशासन अधिकारी किरण यादव आदी उपस्थित होते.
सुरुवातीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती आणि उद्बोधन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहेत. माळीणसारख्या दुर्घटना होऊ नयेत, त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपल्या कार्यशैलीत बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपत्तकालीन २००५ कायदा अंमलात आलेला आहे. आपली तयारी असल्यास आपत्तीपासून होणारे नुकसान निश्चितपणे टाळले जाऊ शकते,’ असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकरी मुदगल म्हणाले, ‘सूत्रबद्धपद्धतीने केली जाणारी उपाययोजना आणि पुनर्वसन हा मोठा विषय आहे. आपत्ती झाल्यानंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी आपली तयारी असणे आवश्यक आहे. मग ती मानवनिर्मित अथवा नैसर्गिक आपत्ती असो.’
आपत्तीचे तीन प्रकार सांगता येतील, असे म्हणून मुदगल पुढे म्हणाले, ‘काळ निश्चित आणि आपत्ती निश्चित यामध्ये पावसाळा या काळामध्ये पूर प्रवणक्षेत्रात पूर येऊ शकतो. डोंगरी भागात कडे कोसळू शकतात, त्या दृष्टीने आपली तयारी पूर्ण करावी लागते. दुसऱ्या प्रकारामध्ये कालावधी निश्चित; परंतु आपत्ती निश्चित नसते. यामध्ये एलनिनोचा समावेश असू शकतो. दर दहा वर्षांनी एलनिनो येणारच. यामध्ये कालावधी निश्चित आहे. परंतु पूर येणार की दुष्काळ पडणार, याबाबत निश्चिती नसते. तिसऱ्या प्रकारामध्ये काळ आणि आपत्ती दोन्हींही अनिश्चित स्वरूपाची असतात. उदाहरणार्थ अवकाळी पाऊस, अपघात.’ (प्रतिनिधी)
वातावरणातील बदलामुळे पावसाची अनिश्चितता
पुणे येथील आपत्ती व्यवस्थापक केंद्राचे संचालक मिलिंद वैद्य यांनी या कार्यशाळेत वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसाची अनिश्चितता, अवेळी पाऊस, गारपीट, ढगफुटी या कारणांमुळे निर्माण झालेली पाणी टंचाई, चारा टंचाई तसेच आर्थिक व सामाजिक नुकसान. आपत्तीमध्ये झालेले नुकसान मूळ पदावर आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना व सुरक्षितता याविषयी माहिती दिली.

Web Title: Create Disaster Management Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.