वाई तालुक्यात गावपातळीवर सोयीच्या आघाड्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST2021-01-08T06:07:52+5:302021-01-08T06:07:52+5:30
वाई : राज्यात तीन पक्षांचे सरकार विरुद्ध भाजप असे समीकरण असून, राज्य पातळीवरील नेते सर्व निवडणुकांमध्ये आघाडीचे घटक पक्ष ...

वाई तालुक्यात गावपातळीवर सोयीच्या आघाड्या!
वाई : राज्यात तीन पक्षांचे सरकार विरुद्ध भाजप असे समीकरण असून, राज्य पातळीवरील नेते सर्व निवडणुकांमध्ये आघाडीचे घटक पक्ष एकत्र लढणार, असे म्हणत असले, तरी ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक परिस्थिती पाहून समीकरणे बदलताना दिसत आहेत. गावापातळीवर मुख्य प्रबळ असलेल्या पक्षाच्या विरोधात बाकीचे पक्ष एकत्र येऊन लढताना दिसत आहेत. यामध्ये राज्य पातळीवरील आघाडीला तिलांजली दिल्याचे चित्र दिसत आहे.
वाई तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या २४२ वॉर्डमधील ६०६ जागांसाठी एकूण १ हजार १५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत १२ ग्रामपंचायतींतील १८ अर्ज बाद झाले होते. तालुक्यातील १९ पूर्णतः बिनविरोध झाल्या असून, ५७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लागली आहे. निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्येही काही गावांमध्ये काही वाॅर्ड बिनविरोध झाले आहेत. तालुक्यात अनवडी, उलुंब, वेलंग, बोपेगाव, दसवडी, कनूर, कोंढवली, वयगाव, जांब, जोर, किरुंडे, परतवडी, वाशिवली, शेलारवाडी, वेरुळी, वासोळे, मुंगसेवाडी, खावली आणि अनपटवाडी आदी गावे बिनविरोध झाली असून, उरलेल्या ५७ ग्रामपंचायतींमध्ये मतदान १५ जानेवारी रोजी होणार आहे.
निवडणूक होणाऱ्या गावांमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कोठेही वापरताना दिसून येत नाही. बावधन हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानले जात असले, तरीही बावधनमध्ये भाजप-शिवसेनेमध्ये युती झाली असून, राष्ट्रवादी विरोधात शिवसेना-भाजप लढत असून, काँग्रेस पक्ष तटस्थ भूमिकेत आहे, तर परखंदीत राष्ट्रवादीची भाजपसोबत युती झाली असून, काँग्रेसला खिंडीत पकडण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली आहे. परंतु काँग्रेसचे विराज शिंदे यांचे पारडे जड आहे. केंजळमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत आहे. पसरणीत राष्ट्रवादीत दोन गट पडले असून, एका गटाने भाजपबरोबर युती केली असून, आरपीआयने एका वाॅर्डात बंडखोरी करून तीन उमेदवार अपक्ष म्हणून उभे केले आहेत. चिखलीमध्ये विकास शिंदेंच्या काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी व शिवसेनेची युती झाली असून, चिखलीतील तीन वाॅर्डपैकी दोन वाॅर्ड बिनविरोध झाले आहेत. एका वाॅर्डमध्ये निवडणूक लागलेली आहे. मेणवली ग्रामपंचायतीत काँग्रेसने जुळवून घ्यावयाचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे मेणवली ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी विरुध्द काँग्रेस अशी सरळ लढत आहे.
चौकट..
राष्ट्रवादीचे पारडे जड... भाजपची कडवी झुंज, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई
इतर गावांतील ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीच्या फाॅर्म्युल्याला तिलांजली देत स्थानिक आघाड्या करीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. उर्वरित ५७ ग्रामपंचायती निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, १८ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. आमदार मकरंद पाटील यांचे तालुक्यातील निवडणुकीवर बारीक लक्ष असून, आजमितीला वाई तालुक्यात राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. भाजपने राष्ट्रवादीशी कडवी लढत दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे.