सात मतदारसंघांत काँग्रेसची तयारी!
By Admin | Updated: September 16, 2014 23:37 IST2014-09-16T23:12:11+5:302014-09-16T23:37:47+5:30
इच्छुकांची यादी दिल्लीला : सातारा वगळता सर्व ठिकाणी ‘स्वबळाची चाचपणी’

सात मतदारसंघांत काँग्रेसची तयारी!
सातारा : विधानसभेला जागा वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सुरू असलेला तिढा अजूनही कायम आहे. काँग्रेसने इच्छुकांची यादी केंद्रीय निवड समितीकडे पाठविली आहे. या यादीत सातारा वगळता उर्वरित सात मतदारसंघांत इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची नावे आहेत.
आघाडी झाली तरी पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी ‘मैत्रीपूर्ण लढती’ची मागणी केली आहे. जिल्ह्यात आठ मतदारसंघ असून, यापैकी सहा मतदारसंघांत राष्ट्रवादी, तर दोन मतदारसंघांत काँग्रेसचे आमदार आहेत. ‘कऱ्हाड दक्षिण’चे आमदार विलासराव पाटील-उंडाळकर असले तरी येथून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव केंद्रीय निवड समितीकडे पाठविले आहे. माणचे आमदार असलेले जयकुमार गोरे निवडून आल्यानंतर पाच वर्षांनी काँग्रेसवासी झाले. त्यांचेच नाव दिल्लीला पाठविले आहे. फलटण मतदारसंघ राखीव आहे. येथून माजी खा. हिंदुराव नाईक-निंबाळकर गटाचे दिगंबर आगवणे यांचे नाव दिल्लीला पाठविले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील ‘स्वाभिमानीे’त प्रवेश केल्यामुळे काँग्रेसची अडचण झाली. परिणामी काँग्रेसने येथून माजी समाजकल्याण समिती सभापती बाळासाहेब शिरसाट यांचे नाव दिले. (प्रतिनिधी)
दिल्लीला पाठविलेली नावे
कऱ्हाड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण
कऱ्हाड उत्तर : धैर्यशील कदम पाटण : हिंदुराव पाटील वाई : मदन भोसले माण : जयकुमार गोरे कोरेगाव : किरण बर्गे, विजय कणसे
फलटण : बाळासाहेब शिरसाट
राष्ट्रवादीचे चार उमेदवार निश्चित
राष्ट्रवादी काँग्रेसने चार मतदारसंघांतील उमेदवारांची नावे अंतिम केली आहेत. यामध्ये शशिकांत शिंदे (कोरेगाव), शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा), बाळासाहेब पाटील (कऱ्हाड उत्तर), मकरंद पाटील (वाई) यांचा समावेश आहे.
साताऱ्यात उमेदवाराचा शोध
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी आमदार सदाशिव सपकाळ इच्छुक होते. मात्र, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला. दरम्यान, आघाडी नाहीच झाली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी स्वबळावर लढले तर साताऱ्यातून काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे अशा उमेदवाराचा शोध असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांनी दिली.