कारखान्यांचे पाप तर काँग्रेसचेच !
By Admin | Updated: April 11, 2016 00:38 IST2016-04-10T22:29:43+5:302016-04-11T00:38:48+5:30
मकरंद पाटील : आरोपाला सडेतोड उत्तर

कारखान्यांचे पाप तर काँग्रेसचेच !
लोणंद : लोणंदमध्ये ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनेच्या निधीतून राष्ट्रवादी काँग्रेसने विकास केला आहे. लोणंदच्या औद्योगिक वसाहतीच्या प्रदूषणाचा त्रास लोणंदकरांना सहन करावा लागत आहे. याचे खापर आमच्या माथी मारणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनीच त्यांच्या सत्तेच्या काळात कारखान्यांना ग्रामपंचायतीच्या परवानग्या दिल्या आहेत,’ असा पोलखोल आमदार मकरंद पाटील यांनी करून काँग्रेसच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले.
लोणंद येथील राष्ट्रवादी काँग्रेस उमेवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मनोज पवार, एन. डी. क्षीरसागर, विश्वास शिरतोडे, दादासाहेब ठोंबरे, बबनराव शेळके, रतन जाधव, नाना जाधव, गीतांजली क्षीरसागर, लीलाबाई जाधव उपस्थित होते.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, ‘लोणंद शहराचा कायापालट करण्याचा राष्ट्रवादीने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते आरोप करीत आहेत. लोणंदच्या औद्योगिक कंपन्यांना उभारणीचे स्थानिक परवाने ग्रामपंचायतीने विरोधकांच्याच काळात दिले.
उलटपक्षी माझ्याकडे लोकांच्या कंपनीसंदर्भातील तक्रारी आल्यानंतर संबंधित कंपन्यांना मी सूचना देऊन योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना केल्या; परंतु आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्यावर खोटे आरोप करण्याची विरोधकांची सवय
आहे. त्याला जनताच उत्तर
देईल.’
आनंदराव शेळके-पाटील म्हणाले, ‘लोणंदच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी मिळविला. विरोधकांना पंधरा वर्षांत जे जमले नाही, ती कामे आम्ही मार्गी लावली. लोणंद नगरपंचायतीला विरोध केला हा आरोप खोडसाळपणाचा आहे.’
विश्वास शिरतोडे म्हणाले, ‘ज्याला विकास कळतो तोच राजकारणात टिकून राहतो. इंदिरानगरमध्ये ज्यांना रस्त्यावर डांबराचा एक बॅरलही ओतता आला नाही. त्यांनी आम्हाला विकास शिकवू नये.’ (वार्ताहर)
राष्ट्रवादीकडे
अपक्षांचा कल
या निवडणुकीत अपक्षांनी राष्ट्रवादीकडे झुकण्याचा कल दिसत आहे. प्रभाग चारमध्ये अपक्ष मंगल कांबळे, प्रभाग चौदामध्ये योगेश परदेशी यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केले आहे, तर अपक्ष अमोल शेळके यांनी राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा देत राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे बळ वाढत आहे.