उंडाळेत विद्यार्थ्यांसाठी सवलत पास केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST2021-01-08T06:04:51+5:302021-01-08T06:04:51+5:30
सिग्नल यंत्रणा सुरळीत करण्याची मागणी कऱ्हाड : शहरातील सिग्नल यंत्रणा अनेकदा बंद अवस्थेत असल्याने वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे ...

उंडाळेत विद्यार्थ्यांसाठी सवलत पास केंद्र सुरू
सिग्नल यंत्रणा सुरळीत करण्याची मागणी
कऱ्हाड : शहरातील सिग्नल यंत्रणा अनेकदा बंद अवस्थेत असल्याने वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे शहरातील सिग्नल यंत्रणा नियमित सुरू राहावी, अशी मागणी नागरिक व वाहनधारकांकडून केली जात आहे. शहरात एकूण सहा ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. कोल्हापूर नाका, कर्मवीर चौक, विजय दिवस चौक, उपजिल्हा रुग्णालय चौक, कृष्णा नाका या ठिकाणी सिग्नल यंत्रणा आहे. मात्र, अनेकदा ही यंत्रणा बंद असते. भेदा चौकातील यंत्रणा गत कित्येक दिवसांपासून बंदच आहे, तर विजय दिवस चौक येथील यंत्रणा अनेकदा बंद पडते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. या यंत्रणेकडे पालिका व पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सिग्नल यंत्रणेच्या आसपास असणारी झाडी व फांद्या काढून टाकाव्यात, अशीही मागणी केली जात आहे.
कऱ्हाडात प्लास्टिक पिशव्या विक्रीवर ‘वॉच’
कऱ्हाड : शहरात काही दिवसांपूर्वी प्लास्टिक पिशव्यांची खरेदी करताना पालिका आरोग्य विभागाच्या पथकाने एका व्यापाऱ्याला पकडले होते. त्यांच्याकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करीत त्यास पाच हजार रुपयांचाही दंड केला होता. शहरात प्लास्टिक पिशव्या बंदीची घोषणा करूनदेखील विक्री व वापर होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने अधिक तीव्रपणे कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रभागनिहायक पथकांची स्थापना केली असून, त्या पथकातील अधिकाऱ्यांमार्फत भाजी मंडई, बसस्थानक तसेच मुख्य बाजारपेठ परिसरात वॉच ठेवला जात आहे.
किरपे ते येणके मार्गावर विहीर धोकादायक
तांबवे : किरपे ते येणके रस्त्यावर व येणके हद्दीत असलेली विहीर धोकादायक ठरत आहे. रस्त्याकडेला काढण्यात आलेल्या या विहिराला संरक्षक कठडेही बांधण्यात आलेले नाहीत. याशिवाय कोणत्याही सूचनांचे फलक लावले गेले नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. परिणामी रात्रीच्या वेळी या मार्गावरून जाताना दुचाकी वाहनचालकांची फसगतही होत आहे. या विहिरीबाबत संबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी वाहनधारकांसह प्रवाशांतून केली जात आहे.
ईदगाह मैदान रस्त्याची खड्ड्यांमुळे मोठी दुरवस्था
कऱ्हाड : येथील पोपटभाई पेट्रोल पंपापासून ईदगाह मैदानाकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या मार्गावरून एसटीसह इतर अवजड वाहनांची वर्दळ असते. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी विजय दिवस चौकातून कोल्हापूर नाक्याकडे जाणारी वाहतूक या मार्गावरून वळविण्यात आली आहे. मात्र, रस्त्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे.