सलून व्यवसाय करत बसविली समाजाची घडी!

By Admin | Updated: April 26, 2016 00:27 IST2016-04-25T23:01:29+5:302016-04-26T00:27:27+5:30

नाभिक समाज : शिक्षणामुळे अनेक जण विविध क्षेत्रांत कार्यरत; सामाजिक एकीतून आंदोलनांना मिळतेय ताकद

Community set up in the business of salon! | सलून व्यवसाय करत बसविली समाजाची घडी!

सलून व्यवसाय करत बसविली समाजाची घडी!

प्रदीप यादव --सातारा --दगाफटका होण्याची खात्री असतानाही जे प्रतिशिवाजी म्हणून सिद्धी जोहरच्या भेटीस गेले, ते वीर शिवा काशीद, प्रतापगडावर जिवाची बाजी लावणारा वीर जिवा महाले यांची नाव उच्चारताच आजही शिवरायांचा ज्वलंत इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. नाभिक समाजातील असे शूरवीर आणि अनेक क्रांतिकारकांनी स्वराज्यासाठी, भारतभूमीसाठी प्राण पणाला लावले. रक्तातच लढण्याची जिद्द असलेल्या नाभिक समाजातील अनेक जण आज विविध क्षेत्रांत उच्च पदावर सेवा बजावत आहेत.
सातारा जिल्ह्यात नाभिक समाजाची लोकसंख्या ८० हजारांच्या जवळपास आहे. जिल्हाभर पसरलेला हा समाज एक व्हावा आणि समाजापुढील प्रश्न सोडविण्यासाठी वीर जिवाजी नाभिक समाज संघटनेची १९८० मध्ये स्थापना करण्यात आली. दिवंगत माजी पोलिस अधिकारी दत्तात्रय इंगळे, एकनाथराव साळुंखे, अच्युतराव जाधव, भाऊ दळवी यांच्या माध्यमातून संघटनेचे काम सुरू झाले. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेचे सातारा जिल्ह्यात काम सुरू आहे. सध्या जिल्हाध्यक्ष भानुदास वास्के, शहराध्यक्ष म्हणून लक्ष्मण जाधव हे काम पाहतात.
बारा बलुतेदारांपैकी एक असणारा हा नाभिक समाज. पूर्वांपार केस कर्तनाचा व्यवसाय करणारा हा समाज आज शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांत उच्च पदावर काम करत आहे. संघटनेच्या माध्यमातून हणमंतराव साळुंखे यांच्या प्रेरणेतून भाऊ दळवी, बापूराव काशीद, संतोष साळुंखे, चंद्रकांत पवार, सदाभाऊ सपकाळ, सुरेश पवार, आबासाहेब माने, एकनाथ शिर्के, अशोक सूर्यवंशी, बाळासाहेब काशीद, संपतराव पवार, बाळासाहेब पवार ही कार्यकर्त्यांची फळी समाजापुढील प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करीत आहे.
वीर जिवाजी शिक्षणोत्तेजक संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक मदत दिली जाते. प्राचार्य सुरेशराव गायकवाड हे याचे काम पाहतात. मुलांनी शिकावं, मोठं व्हावं आणि समाजोन्नतीसाठी कार्य करावं, हा यामागील उद्देश आहे.
सलग पाच वेळा विधानपरिषद सभापती राहिलेले शंकरराव जगताप, हणमंतराव साळुंखे यांनी कोल्हापूर येथे १९८१ मध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळाची स्थापना केली. या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक मेळावे घेऊन समाजजागृतीचे काम झाले. बलुतेदारी पद्धत बंद केली. सलून दुकानदारांना आर्थिक पाठबळ देऊन व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न करण्यात आले. अस्वच्छतेचा ठपका पुसून टाकला. सलून स्वच्छता डोळ्यात भरण्यासारखी दिसते, ती एकत्रित प्रयत्नांमुळे. नाभिक समाजानं कात टाकली असल्याचं चित्र दिसत आहे.

संघटनेसमोरील प्रश्न
वीर जिवाजी नाभिक समाज संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर सातारा जिल्ह्यात आंदोलने होत आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी होती ती वीर जिवाजी महाले यांचे स्मारक प्रतापगडावर व्हावे. हा प्रश्न संघटनेच्या स्थापनेपासून म्हणजे १९८० पासून भिजत पडला आहे, असे संतोष साळुंखे यांनी सांगितले. त्यावर प्रशासकीय पातळीवर निर्णय होत आहेत. मात्र, अद्याप स्मारक उभे राहिले नाही. सलूनधारकांना सातारा बसस्थानकात स्टॉल मिळावा, नाभिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, व्यावसायिकांना पेन्शन योजना सुरू व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून वारंवार आंदोलने छेडली जात आहेत.

Web Title: Community set up in the business of salon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.