ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST2021-01-08T06:06:13+5:302021-01-08T06:06:13+5:30

औंध : खटाव तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सततचे ढगाळ ...

Clouds of anxiety in the minds of farmers due to cloudy weather! | ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग!

ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग!

औंध : खटाव तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सततचे ढगाळ आणि पावसाचे वातावरण झाल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. यावर्षीचे हाता-तोंडाशी आलेली पिके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याच्या धास्तीने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली आणि त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिलासा दिला, तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. मात्र, शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने पाण्याचा प्रश्न मिटविला. यामुळे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली. यावर्षी कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळाल्याने बहुतांश शेतकरी कांद्याकडे वळले आहेत. त्याचबरोबर गहू, ज्वारी, हरभरा या पिकांनाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. मात्र, सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्याने परिणामी उत्पन्नात घट होण्याची धास्ती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. सततचे ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने गव्हावर तांबेरा आला आहे. यासोबतच काही भागामध्ये गव्हावर अळीचाही प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळाले.

या प्रतिकूल हवामानामुळे नवीन लावलेल्या कांद्यालाही करप्याने वेढले आहे. त्यामुळे कांद्याची नवीन लागवड धोक्यात आली आहे.

चौकट...

शेतकऱ्यांकडून विविध औषधांच्या फवारण्या..

या खराब हवामानाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध औषधांच्या फवारण्या सुरू केल्या आहेत. शेतकरी महागडी औषधे फवारणी करताना दिसून येत आहेत. परंतु हवामान सुधारले नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल. यावर्षी शेवटी पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध झाले. परिणामी यावर्षी चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा होती. परंतु ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने यावर्षीच्या उत्पन्नावर देखील पाणी फिरते की काय? या धास्तीने शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग आले आहेत.

०७औंध

फोटो :

औंधसह परिसरात ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग पडू लागला आहे. (छाया-रशीद शेख)

Web Title: Clouds of anxiety in the minds of farmers due to cloudy weather!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.