सातारा शहरातील
रस्त्यांची धुळधाण
सातारा : सातारा शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे केवळ खडी व डांबर टाकून बुजविण्यात आले आहेत. डागडुजीचे काम दर्जेदार न झाल्याने दुरुस्तीसाठी वापरण्यात आलेली खडी उखडली असून, परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. या खडीमुळे सर्वत्र धुरळा उडत असून, वाहनधारकांसह पादचाऱ्यांना धुळीतूनच प्रवास करावा लागत आहे. राजवाडा ते समर्थ मंदिर चौक, बोगदा परिसर या रस्त्याची अवस्था तर अत्यंत दयनीय झाली असून, नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पाण्याचा अपव्यव;
कारवाईची मागणी
सातारा : शहरातील बोगदा, समर्थ मंदिर परिसर व माची पेठ परिसरातील नागरिकांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय केला जात आहे. गरजेपेक्षा अधिक पाण्याचा वापर होत असून, याकडे कोणाचेही नियंत्रण नाही. सध्या कासची पाणीपातळी हळूहळू खालावू लागली आहे. पालिकेकडून नागरिकांना ठरवून दिल्याप्रमाणे व ठरलेल्या वेळेत पाणीपुरवठा केला जात आहे. या भागातील अनेक नळांना तोट्या नसल्याने पाण्याची नासाडी होत आहे. पाणीपुरवठा विभागाने पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
साईडपट्ट्या खचल्या;
अपघाताचा धोका
नागठाणे : तारळे - नागठाणे दरम्यान साईडपट्ट्या खचल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यंदा पावसाळ्यात रस्त्याच्या साईडपट्टीवरून पाणी वाहून गेल्याने साईडपट्ट्यांचा भरावही वाहून गेला आहे. संबंधित विभागाने खड्ड्यांची दुरुस्ती करण्याबरोबरच साईडपट्ट्या भरून घ्यावात, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांमधून होत आहे.