साताऱ्यातील नागरिक शहाणेच... गाढव गायब !
By Admin | Updated: June 21, 2016 01:19 IST2016-06-21T00:36:47+5:302016-06-21T01:19:52+5:30
परिवर्तनासाठी प्रयत्न : कर्तव्य सोशल ग्रुपच्या अनोख्या फलकांचे नागरिकांकडून स्वागत

साताऱ्यातील नागरिक शहाणेच... गाढव गायब !
सातारा : आपल्या सभोवतालचा परिसर अस्वच्छ राहिल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळत असते. आपला परिसर आणि शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता कचरा घंटागाडी अथवा कचराकुंडीत न टाकता अस्ताव्यस्त टाकणाऱ्या बेजबाबदार लोकांच्या कृतीत परिवर्तन व्हावे, यासाठी ‘कर्तव्य’च्या वतीने फलक लावण्यात आले होते. या फलकांचे नागरिकांनी स्वागत केले आहे. लोकांनी आता कचरा टाकणे बंद केले आहे.
स्वच्छ, सुंदर आणि निरोगी सातारा निर्माण करण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून स्वच्छता जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी ग्रुपच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी स्वच्छताविषयक फलक लावण्यात आले होते. तसेच नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे, स्वच्छतेला स्वत:पासून सुरुवात व्हावी, या उद्देशाने या अभियानात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वच्छतादूत म्हणून सहभागी करून घेण्यात आले आहे. वेदांतिकाराजे भोसले यांच्या पुढाकाराने कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून शहरातील अनेक वार्डांत, महामार्गावर व अन्य महत्त्वाच्या व आवश्यक ठिकाणी स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली होती. स्वत: वेदांतिकाराजे भोसले यांनी हातात झाडू घेऊन या मोहिमेचे नेतृत्व केल्याने स्वच्छता अभियानात महिला आणि नागरिकांचा सहभाग वाढला आहे. घरातील कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीत टाकावा. नगरपालिकेने प्रत्येक वार्डात ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीत स्वतंत्र दोन कंपार्टमेंट केले आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनीही ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून पालिकेला स्वच्छ आणि सुंदर शहर निर्मितीसाठी सहकार्य केले पाहिजे. ‘कर्तव्य’च्या स्वच्छता अभियान आणि जनजागृतीमुळे शहरात मोठा फरक जाणवत आहे. कचरा घंटागाडीत टाकण्यासाठी लोक परावृत्त होत असल्याने खऱ्या अर्थाने स्वच्छ, सुंदर साताऱ्याचे स्वप्न साकार होण्यासाठी मदत होत आहे.
दरम्यान, काही मोजके लोक कचरा घंटागाडी अथवा कचराकुंडीत न टाकता रस्त्यावर, ओढे नाले याठिकाणी फेकत होते. एका ठिकाणी कचरा पडल्याचे दिसले की, पुन्हा काही बेजबाबदार लोकही त्याच ठिकाणी कचरा टाकायचे आणि मग, कचऱ्याचा ढीग साचतो. त्यामुळे दुर्गंधी आणि रोगराई पसरते. आपण सर्वजण सुशिक्षित आहोत. त्यामुळे आपल्या घरातील कचरा उघड्यावर टाकून आपणच आजारांना निमंत्रण देत असतो. स्वाईन फ्लू, डेंग्यू, हिवताप, मलेरिया आदी आजार घाणीच्या साम्राज्यामुळे फैलावत असतात. हे आजार जीवघेणे ठरल्याची अनेक उदाहरणे आपण पाहत असतो. आपल्या कचऱ्याला आपणच जबाबदार आहोत. एक सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी म्हणून आपण आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन वेदांतिकाराजे भोसले यांनी नागरिकांना केले होते. तसेच अशा बेजबाबदार लोकांच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची पथकेही तयार करण्यात आली होती. अशाप्रकारे लोकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, शहरातील अनेक ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकणे बंद केले आहे. त्यामुळे उघड्यावर कचरा पडत नाही. (प्रतिनिधी)
चूक कळावी यासाठी फलक
घंटागाडी अथवा कचराकुंडीत कचरा न टाकता कचरा इतरत्र टाकणाऱ्या लोकांना आपली चूक कळावी. त्यांना त्यांचा गाढवपणा कळावा, यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपने अनोखे आणि डोळ्यात अंजन घालणारे फलक कचरा पडणाऱ्या जागांवर लावले होते. ज्याठिकाणी लोक कचरा टाकतात त्याठिकाणी शहराचे विद्रूपीकरण करणारा, दुर्गंधी व रोगराई पसरवणारा हा कचरा कुठल्या गाढवाचा असा मजकूर असलेले फलक लावण्यात आले होते. या फलकांमुळे का होईना रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांचा गाढवपणा बंद होईल, अशी अपेक्षा होती. त्याला यश मिळाले आहे.