...तर मुख्यमंत्री लढणार !

By Admin | Updated: July 13, 2014 23:02 IST2014-07-13T23:01:53+5:302014-07-13T23:02:58+5:30

संकेत : कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यास कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी

Chief Minister will fight for ... | ...तर मुख्यमंत्री लढणार !

...तर मुख्यमंत्री लढणार !

कऱ्हाड : ‘आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व मीच करणार आहे, असे ठामपणे सांगत असतानाच कार्यकर्त्यांचा आग्रह झाल्यास कऱ्हाड दक्षिणेतून स्वत: उभे राहण्याबाबत विचार करू,’ असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले़
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज, रविवारी कऱ्हाड दौऱ्यावर असताना त्यांनी जखिणवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार आनंदराव पाटील, जयकुमार गोरे, मदनराव मोहिते, डॉ़ इंंद्रजित मोहिते, जयवंत जगताप, धोंडिराम जाधव, शिवराज मोरे, आदींची उपस्थिती होती़
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे़ माझ्या नेतृत्वाखालीच त्या लढविणार आहोत़ राष्ट्रवादी अन्् आम्ही एकत्रितच लढू़ लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन आम्ही आमच्यातही काही बदल करवून घेणार आहोत़ उमेदवार निवडीचा पहिला अन् महत्त्वाचा टप्पा डोळ्यांसमोर आहे़ युतीचा कारभार जनतेने यापूर्वी अनुभवला आहे. म्हणून तर त्यांनी सलग पंधरा वर्षे आघाडीच्या हातात सत्ता दिली आहे. या निवडणुकीतही तसेच होईल. आपली कऱ्हाड दक्षिणेवरील स्वारीची तयारी सुरु आहे का? असे छेडले असता, ‘तसे काही नाही, कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधायचा होता म्हणून आलोय, असे ते म्हणाले; पण काल, शनिवारी जिल्हा काँग्रसने पक्ष निरीक्षकांकडे तुम्ही दक्षिणेतून लढावे, असा ठराव केलाय अन् कार्यकर्त्यांचीही अपेक्षा आहे, यावर ‘कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचा जरूर विचार करू,’ असे उत्तर देत त्यांनी दक्षिणेतून लढण्याचे संकेतच दिले आहेत़ मुख्यमंत्री बदलाच्या बातम्या पेरणाऱ्यांचा शोध लागला का? असे विचारताच ‘काहींची नावे कळालीत. काहींची कळतील,’ असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
प्रथमच सोडले मौन
कऱ्हाड दक्षिणच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज प्रथमच मौन सोडले. यापूर्वी पत्रकारांनी दक्षिणेवरील स्वारीबाबत त्यांना अनेकदा छेडले; पण त्याचे उत्तर देणे मुख्यमंत्र्यांनी खुबीने टाळले. गत आठवड्यात मुख्यमंत्री चव्हाण कऱ्हाड दौऱ्यावर होते, त्यावेळी पत्रकार परिषदेपूर्वीच संपर्कमंत्र्यांनी ‘स्थानिक काही विचारू नका,’ असे अगोदरच सांगितले होते. आज मात्र पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती करताच त्यांना दक्षिणच्या उमेदवारीबाबत आपले मौन सोडावे लागले अन् त्यांनी दक्षिणेतून लढण्याचे संकेतही दिले.
भविष्यात छोटे-छोटे जिल्हे
‘कऱ्हाड जिल्ह्याचा प्रश्न बारामतीकरांमुळे अडलाय का?’ असे विचारताच ‘तसे काही नाही. ठाणेची लोकसंख्या मोठी होती. त्याचे विभाजन गरजेचे होते म्हणून तो पहिल्यांदा निर्णय घेतलाय. १ आॅगस्टला त्याची अधिकृत घोषणा होईल. १५ आॅगस्टपासून त्यांचा स्वतंत्र कारभार सुरू होईल; पण भविष्यात छोटे-छोटे जिल्हे करावेच लागणार आहे,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Chief Minister will fight for ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.