मुख्यमंत्र्यांनी घेतला जनता दरबार!
By Admin | Updated: July 13, 2014 22:52 IST2014-07-13T22:50:26+5:302014-07-13T22:52:19+5:30
विकासकामांचा आढावा : ७५ गावांच्या शिष्टमंडळाशी थेट संवाद

मुख्यमंत्र्यांनी घेतला जनता दरबार!
मलकापूर : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जखिणवाडी (ता़ कऱ्हाड) येथे कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा जनता दरबार घेतला. प्रत्येक गावात सुरू असलेल्या विकासकामाबाबत व भविष्यातील अवश्यक कामांबाबत ७५ गावांच्या शिष्टमंडळांशी त्यांनी थेट संवाद साधला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज विविध कार्यक्रमानिमित्त कऱ्हाड दौऱ्यावर आले होते़ जखिणवाडी ते आगाशिव पर्यटनस्थळांतर्गत डोंगरपायथ्यापर्यंतच्या १ कोटी १० लाख निधीतून रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी आमदार जयकुमार गोरे, आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, डॉ इंद्रजित मोहिते, मनोहर शिंदे, जखिणवाडीचे सरपंच नरेंद्र नांगरे-पाटील, रामचंद्र पाटील, शामराव नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी रामास्वामी एन. यांची प्रमुख उपस्थिती होती. दुपारी एक वाजता जखिणवाडीचे सरपंच नरेंद्र पाटील यांच्या घरी मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबाराची व्यवस्था करण्यात आली होती. या दरबारात मुख्यमंत्र्यांचे सर्व स्वीय सहायक उपस्थित होते. मुख्यमंत्रिपद सांभाळल्यापासून कऱ्हाड दक्षिणेतील प्रत्येक गावात किती निधी दिला व तो कोणत्या कामांसाठी दिला, ती कामे कुठपर्यंत आली, याबाबत प्रत्येक गावाच्या शिष्टमंडळाशी मुख्यमंत्री चव्हाण यांनी थेट संवाद साधला. रखडलेल्या कामातील अडचणीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर प्रत्येक गावात भविष्यातील आवश्यक कामांबाबत निवेदने स्वीकारून त्यावर चर्चा करीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कामाच्या सूचना केल्या. (प्रतिनिधी)