छाताडावर डोंगर.. अन् जीव मुठीत!
By Admin | Updated: July 30, 2014 23:17 IST2014-07-30T23:17:16+5:302014-07-30T23:17:32+5:30
सातारा जिल्ह्यातील कैक माळीण गावांची कहाणी...

छाताडावर डोंगर.. अन् जीव मुठीत!
ग्रामस्थांच्या डोक्यावर कड्याची टांगती तलवार
सातारा : पुणे जिल्ह्यातल्या ‘माळीण’चं भीषण दृष्य अंगावर शहारं आणणारं. मनाचा थरकाप उडविणारं. असं दुर्दैव दुसऱ्या कोणत्या गावावर येऊ नये, असं प्रत्येकालाच वाटतंय; परंतु सातारा जिल्ह्यातील कैक गावं आजही डोंगर छाताडावर घेऊन जगताहेत. पावसाळ्यात जीव मुठीत धरून एकेक दिवस काढणाऱ्या भयभीत गावांचा ‘लोकमत टीम’नं घेतलेला हा वेध...
पाटण/मणदुरे : मेंढोशी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या सडावाघापूर लगतच्या पठाराखाली ६१ कुटुंबांची बोर्गेवाडी धोकादायक कड्याखाली वसली आहे. डोक्यावर कड्याची टांगती तलवार घेऊन येथील ग्रामस्थ राहत आहेत.
पाटणच्या मणदुरे विभागातील बोर्गेवाडी कड्याच्या आडोशाला वसली आहे. म्हणून कड्याखालची बोर्गेवाडी अशी तिची ओळख आहे. १९९४ मध्ये झालेल्या भूकंपात बोर्गेवाडीवरचा कडा खिळखिळा झाला. कड्याचा काही भाग सुटलेला, यामुळे येथील कुटुंबांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी आ. विक्रमसिंह पाटणकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना याठिकाणी हेलिकॉप्टरने आणून परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती.
त्यानंतर या गावचे पुनर्वसन दक्षिणेकडील बाजूस करण्यास निधी उपलब्ध करून दिला. याठिकाणी रस्ते, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, विजेची सोय, पाणी आदी सोयी देण्यात आल्या. त्यावेळी २९ कुटुंबांनी घरे बांधून पुनर्वसन स्वीकारले. मात्र, २१ कुटुंबांनी आहे त्याच ठिकाणी राहणे पसंत केले.
गावात राजकारण शिरल्याने याठिकाणी आणखी एक पुनर्वसन मंजूर झाले. मात्र पहिल्या ठिकाणीच लोकांनी पुनर्वसन स्वीकारले. मात्र, घर बांधण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अद्याप चार कुटुंबे धोकायदायक कड्याखालीच वास्तव्य करीत आहेत. (प्रतिनिधी)
अर्धा पाटण तालुका डोंगराच्या आडोशाला
पाटण तालुक्यातील सुमारे शंभर गावे डोंगर कड्याच्या आडोशाला वसलेली आहेत. पावसाळ्यात या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. २००५ मध्ये चेवलेवाडी गावात डोंगर खचल्याने तेथील पंधरा खणाचे घरही खचले. अनेक घरांच्या भिंती पडल्या. घाणव येथील डोंगराचा भाग सुटून तो शेतजमिनीत कोसळला. जवळपास अर्धा पाटण तालुका डोंगराच्या आडोशाला वसला असून ग्रामस्थ धोकादायक जीवन जगत आहे.
गावावर संकट ३०० फूट उंचीचे
परळी : परळी खोऱ्यातील कोळोशी गावातील सुमारे पंचवीस कुटुंबे तीनशे फूट उंच कड्याखाली राहत आहेत. पावसाळ्यात कडा कोसळण्याच्या भीतीने ही कुटुंबे जीव मुठीत धरून येथे राहत आहेत. कोळोशी गावची लोकसंख्या २५० आहे. हे गाव गावदार कड्याच्या खाली वसलेले आहे. या कड्याचा काही भाग सुटलेला आहे. सध्या या भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने कड्याचे दगड कोसळत आहेत. कोसणारे दगड दोन ते तीन टन वजनाचे आहेत. हे दगड एखाद्या घरावर कोसळले तर मोठा अनर्थ घडू शकतो. काही घरांना भेगाही पडल्या आहेत. या धोक्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देऊनही अद्याप काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. अवकाळी पावसामुळे कड्याचे दगड सुटून कोसळले. यामध्ये जनावरे बचावली होती. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली होती. मात्र, कार्यवाही झाली नाही. वनविभागानेही हद्दीचा प्रश्न उपस्थित करत या गंभीर स्थितीकडे दुर्लक्षच केले.
जावळी तालुक्यात मानवनिर्मित धोका...
कुडाळ : जावळी तालुक्यातील शिंदेवाडी डोंगर उताराला तर रुईघर डोंगरात आहे. याठिकाणी उद्योजकांनी पाचगणी जवळ असल्यामुळे अवैध बांधकामे केली आहेत. बांधकामासाठी मोठ्या मशिनरींनी उत्खनन करत असताना हादऱ्यामुळे कड्यांना तडे जाऊन ते ढासळण्याच्या स्थितीत आहेत.
रुईघर येथील या अवैध बांधकामामुळे कडे ढासळत असल्यामुळे ग्रामस्थांना भयभीत जीवन जगावे लागत आहे. तर अशीच काही परिस्थिती जावळेवाडी येथे आहे. याठिकाणी छोट्या दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. मोरघर, गुजरवाडी, मोरखिंड या गावांमध्येही धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. अतिपावसात पाण्याच्या प्रवाहामुळे डोंगरावरील माती वाहून जाते. त्यामुळे मोठे दगड मोकळे होऊन डोंगरवरून खाली गावापर्यंत येतात. ही गावे डोंगरउतारावर वसली आहेत. त्यामुळे या गावांना डोंगराचे कडे कोसळण्याचा मोठा धोका आहे.
खचलेली घरं सोडून कुटुंब मंदिरात आश्रयाला...
महाबळेश्वर - तालुक्यातील भेकवली गावात जमीन खचून घरांना भेगा पडल्यामुळे ग्रामस्थ भेदरलेल्या अवस्थेत जीव मुठीत घेऊन जगत आहेत. तालुक्यातील शिंदोळा, नावली, येटणे, एरंडल आढाळ, धारदेव, खालचे माचूतर, देवसरे, विवर, धावटी, चिखली या गावांनाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात भेकवली गावात कदमवस्तीमध्ये जमिनीला भेगा पडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बाधित कुटुंबांना सरपंच केळघणे यांनी स्वत:च्या आसरा दिला. आहे.
मे महिन्यातील अवकाळी पावसात कड्याचा काही भाग निसटला होता. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली होती. मात्र, अद्याप दखल घेतली नाही. तीनशे फूट उंचीचे संकट आमच्यावर कधी कोसळेल, याची खात्री नाही. प्रशासनाने याची दखल घ्यावी.
- बबन डफळ,
कोळोशी ग्रामस्थ
कड्याखाली राहत असलेल्या बोर्गेवाडीच्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास जाण्यासाठी प्रशासनाकडून नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यांना कोणताही धोका होऊ नये, यासाठी आम्ही सतर्क आहोत.
- जयराम बोडके, मंडलाधिकारी, पाटण
जमीन खचल्यामुळे लोक भेदरलेल्या अवस्थेत जीव मुठीत धरून जगत आहेत. येथे अनेकांनी भेटी दिल्या, मात्र कार्यवाही काहीच झाली नाही. प्रशासनाने याची दखल घ्यावी.
सीताराम केळघणे,
सरपंच, भेकवली