चव्हाण अन् पवारांवर दिल्लीचा अन्याय!
By Admin | Updated: November 25, 2015 23:49 IST2015-11-25T23:49:43+5:302015-11-25T23:49:43+5:30
रामराजेंची खंत : यशवंतरावांनंतर शरदरावांचाही झाला नाही बहुमान; अमृतमहोत्सवी पुरस्कारांचे वितरण

चव्हाण अन् पवारांवर दिल्लीचा अन्याय!
सातारा : ‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या इतकीच गुणवत्ता आणि संपूर्ण देशाच्या व्यवस्थेची जाण असणाऱ्या शरद पवारांना पंतप्रधानपद मिळायला हवे होते; परंतु दिल्लीतल्या राजकीय खेळापायी अजून ते घडले नाही,’ अशी खंत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील कृषी, सहकार, महिला सबलीकरण, औद्योगिक, साहित्यिक व क्रीडा क्षेत्रांत उत्कृष्ठ कार्याबद्दल संस्था व व्यक्तींना ‘शरद अमृतवर्ष’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप धरू तसेच संचालकांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बी. डी. पवार म्हणाले, ‘शरद पवार यांनी आपल्या अभ्यासपूर्ण नेतृत्वातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. आयात नाही तर निर्यात करणारा देश म्हणून भारताची ओळख जगभर निर्माण करण्यात पवारांचा प्रमुख वाटा आहे. त्यांच्याच आयात-निर्यात धोरणामुळे आजच्या घडीला कृषी क्षेत्रातून तब्बल २३२ अब्ज रुपयांची निर्यात भारत करतो आहे. दलाली व्यवस्थेला फाटा देऊन शेतकऱ्यांचा मालाला चांगला भाव मिळण्यासाठी व्यावसायिक धोरण राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतल्याने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने व्यावसायिक प्रगती करता आली आहे. १९८९ मध्ये ते मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतीमालाच्या निर्यातीचा पाया घातला. आंबा, द्राक्षे ही फळपिके त्यांनी निर्यात केली. सामुदायिक मार्केटिंग व्यवस्था, बचतगटांना प्राधान्य, हॉर्टीकल्चर मिशन, शेतीत तंत्रज्ञानाचा वापर अशी धोरण त्यांनी राबविली. देशाच्या शेती व्यवसायाला पवारांनीच ऐतिहासिक दिशा दिली आहे.’
अनंत दीक्षित म्हणाले, ‘यशवंतरावांनंतर महाराष्ट्र ज्याला समजला तो शरद पवार यांनाच. दुर्दैवाने या दोघांइतकी जाण असलेला नेता महाराष्ट्रात नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार समाजात रुजवून महाराष्ट्राचं पाऊल पुढे नेण्यात यशवंतरावांइतकंच शरदरावांनाही यश आलेय. कितीही पुढे गेलं तरी गावाची वेस विसरायची नाही, हे दोघांनीही जाणलं होतं. कर्नल संतोष घोरपडे यांच्या बलिदानानंतर पोगरवाडीत त्यांच्या कुटुंबीयांना भेटून व त्यांचे सांत्वन करून पवारांनी ते दाखवून दिले आहे. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्यातलं सगळ्यात मोठं साम्य म्हणजे समकालीन राहणं, हे होय. शिक्षण शक्तीचं सामर्थ्य दोघांच्याही कुटुंबीयांनी जाणले होते. त्यामुळे दोघेही अखिल भारतीय पातळीवर पोहोचू शकले आहेत. ’ (प्रतिनिधी)
शरदरावांना चंद्र, सूर्याची उपमा
‘जिथे समर्पण वृत्ती असते, तिथे जीर्णता कधीच दिसून येत नाही. चंद्र कधीही जुना होत नाही, सूर्य कधीही म्हातारा होत नाही, समुद्र कधीही आकसत नाही,’ अशा भाषेत दीक्षित यांनी शरद पवारांच्या कर्तबगारीला उपमा दिली. यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.’