उत्तरमांड नदीचे पात्र बदलले
By Admin | Updated: June 18, 2014 01:27 IST2014-06-18T01:03:58+5:302014-06-18T01:27:30+5:30
घरांना धोका : संरक्षक भिंत बांधण्याची मागणी

उत्तरमांड नदीचे पात्र बदलले
चाफळ : अतिवृष्टीकाळात चाफळ विभागातील उत्तरमांड नदीपात्रास अनेकदा महापुर येवुन राम मंदिरानजिक गावाच्या मध्यभागी असणारा फरशी पुल सतत पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नदीचे पात्र दक्षिण बाजुस सरकू लागले असुन नदीकाठावरील रामपेठेतील सुमारे २२ घरांना याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने निधिसाठी पाठपुरावा करुन संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी होत आहे.
चाफळला राम मंदिरामुळे अनन्य साधारण महत्व आहे. तसेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव म्हणुन चाफळला ओळखले जाते. येथील डी. बी. वेल्हाळ हे जिल्हा परिषद सदस्य म्हणुन तर राजेश पवार पंचायत समिती सदस्य म्हणुन विभागाचे नेतृत्व करत आहेत. मात्र, या दोन्ही लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्यास कोणीही धजवत नाही. नदीकाठावरील सुमारे २२ घरांना याचा धोका निर्माण झाला आहे. मंदिरापासुन जवळच बसस्थानक असुन मंदिरासमोरील रामपेठेमध्ये अनेक व्यवसायिकांनी लहान-मोठे व्यवसाय सुरु केले आहेत. अतिवृष्टीकाळात या व्यावसायीकांच्या दुकानामध्ये पाणी जावुन नुकसान झाले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला फक्त भाडे वसुली पुरती या व्यवसायिकांची आठवण होते. यापुर्वी नदीचे पात्र उत्तर बाजूस होते. मात्र कालांतराने पाण्याच्या मोठया प्रवाहामुळे नदीपात्रात बदल होवून पात्र दक्षिण बाजूस सरकले. अतिवृष्टीकाळात पुराचे पाणी घरांना वेढा देवू पाहत असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेवुन रहावे लागत आहे. (वार्ताहर)