‘जनता’मुळे पोस्टाचा व्यवसाय वाढला
By Admin | Updated: June 2, 2016 01:00 IST2016-06-02T01:00:09+5:302016-06-02T01:00:09+5:30
हजारो पत्रांचे वितरण : पोस्ट कार्डातून बँक उमेदवारांचा प्रचार

‘जनता’मुळे पोस्टाचा व्यवसाय वाढला
जावेद खान ल्ल सातारा
अलीकडील काळात दूरध्वनी, मोबाईलमुळे घरी पत्र येणे दुर्मीळ झाले आहे. परंतु सध्या जिल्ह्यात जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीमुळे अनेक घरांत पत्र दिसू लागले आहे. उमेदवारांनी पत्रातून प्रचारास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोस्टमन दिसताच जनता बँकेच्या प्रचाराचे पत्र आले ही भावना नागरिकांत होऊ लागली आहे. या निवडणुकीमुळे पत्रांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.
एकेकाळी संदेश देण्यासाठी पोस्ट कार्ड, पत्रांना महत्त्व होते. अनेकांच्या जीवनाचा एक भाग बनलेले हे पत्र अलीकडे दूरध्वनी, मोबाईलमुळे दुर्मीळ झाले आहे. वर्षानुवर्षे घरात पत्र येत नाही, अशी स्थिती आहे. बहुतांश लोकांच्या विस्मृतीतून पत्र ही संकल्पनाच गेली आहे. त्यामुळे पत्र लिहिणे दुर्मीळ ठरले आहे. असे असलेतरी साताऱ्यात या पत्राचा वापर मात्र मोठ्या प्रमाणात होताना दिसून आला आहे. त्याला कारण म्हणजे जनता सहकारी बँक निवडणूक गेल्या १५ दिवसांपासून जनता बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने साताऱ्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत दोन पॅनेल समोरासमोर आहेत. या निवडणुकीत सभासदांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक उमेदवारांनी पोस्ट कार्डचा आधार घेतला आहे. या पत्राच्या माध्यमातून उमेदवार आपली ओळख पटवून देत आहेत. बँकेचे सुमारे १९ हजार सभासद आहेत. या सर्वांपर्यंत पोहोचणे अवघड आहे. त्यामुळे पत्राची शक्कल लढवत सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रात निवडणुकीचाही मजकूर आहे. सातारा शहरातील सुमारे १९ पोस्टमन सध्या उमेदवारांची पत्रे घेऊन जात आहेत. शहरातील जवळपास सर्व सभासदांना पत्राचे वाटपही झाले आहे.
पोस्टमनचा वेळ वाढला...
ऐरवी सकाळी साडेअकराला पत्रे घेऊन पोस्टमन बाहेर पडतात. अलीकडील काही दिवसांत जनता बँक प्रचार पत्रांमुळे पत्रे शार्टिंग करायला वेळ लागत आहे. पत्र वाटप करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या वेळेत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत दुपारी १२ च्या पुढे सर्वजण पत्रे वाटपासाठी बाहेर पडत आहेत.
प्रचाराची बाजू
पत्र वाटप करण्याचे काम पोस्टमनचे आहे. असे असलेतरी जनता बँक निवडणुकीच्या निमित्ताने सध्या पोस्टमन बँकेच्या उमेदवारांचे पत्र अनेक घरी वाटप करीत आहेत. एकप्रकारे जनता बँकेच्या उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी पोस्टमननेच उचलली आहे, असा भास होत आहे.