भाऊ-दादा... कमळ बघ!
By Admin | Updated: August 12, 2014 23:15 IST2014-08-12T22:36:05+5:302014-08-12T23:15:03+5:30
पक्षांतराची लाट : दिग्गज पक्षप्रवेशासाठी आसुसलेले; पंकजा मुंडेंच्या तारखेअभावी येळगावकरांचा प्रवेश रखडला

भाऊ-दादा... कमळ बघ!
सातारा : जिल्ह्यातील अनेक नेत्यांना आता भाजपचे ‘कमळ’ खुणावू लागले आहे. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी घेतलेल्या विनोद तावडे यांनी पहिल्याच दौऱ्यात राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश शिंदे आणि राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष सुशांत निंबाळकर यांच्या हाती कमळ देऊन राष्ट्रवादीला झटका दिला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अन्य काही नेतेही भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत असलेतरी त्याविषयी भाजपकडून गुप्तता पाळली आहे.
भाजपवासी होण्यास निघालेल्या माजी आमदार दिलीप येळगावकर यांना अजूनही पक्षप्रवेशासाठी मुहूर्त मिळालेला नाही. निश्चित झालेला कार्यक्रम रद्द करत त्यांनी ‘माझा प्रवेश खटावमध्ये नको; माणमध्ये घ्या,’ असे कारण पुढे करत भाजपच्या काही नेत्यांना कोड्यात टाकले. मात्र, त्यांना प्रवेशाच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे-पालवेच हव्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दीड महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेले येळगावकर भाजपवासी होणार आहेत. मात्र, त्यांची प्रवेशाची गाडी काही केल्या पुढे जायला तयार नाही. सोमवारी, दि. ११ रोजी त्यांचा खटाव येथे प्रवेश होणार होता. मात्र, स्वत: येळगावकरांनी माझ्या प्रवेशाचा कार्यक्रम कोरेगाव मतदारसंघात असलेल्या खटाव येथे नको, अशी भूमिका ठेवली. अर्थातच यापाठीमागे राजकीय कारणे आहेत. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या आमदार पंकजा मुंडे-पालवे यांची उपस्थिती असायला हवी, यासाठी त्यांनी पक्षाच्या राज्यपातळीवरील नेत्यांकडे आणि पंकजा यांच्याकडे विनंती केली आहे. मात्र, त्या मागणीला अजूनही सकारात्मक असा प्रतिसाद मिळालेला नाही. त्याचीही चर्चा आता माण विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर रंगली आहे.
सातारा दौऱ्यावर असताना येळगावकर त्यांना प्रमुख कार्यकर्त्यांच्या गराड्यातच भेटायला येतील, अशी शक्यता असल्यामुळे अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे होत्या. मात्र, ते कधी आले आणि कधी गेले हेच कोणाला समजले नाही. दरम्यान, तावडेंच्या पत्रकार परिषदेत येळगावकर यांच्या अनुषंगाने छेडले असता त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही, हे विशेष !. भाजपने पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याची जबाबदारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ. विनोद तावडे यांच्यावर देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी कामही सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
माण अन् कोरेगाव कुणाकडे ?
गत निवडणुकीत माण विधानसभा मतदारसंघ भाजपकडे होता. यावेळी दिलीपराव येळगावकर येथून पराभूत झाले. मात्र, आजमितीस महायुतीच्या माध्यमातून हा मतदारसंघ कोणाकडे जाईल, याविषयी कोणीही छातीठोकपणे बोलायला तयार नाही. ‘रासप’चे येथे केडर आहे. ‘स्वाभिमानी’ने लोकसभेला आपली ताकद दाखवून दिली. शिवसेनाही भक्कम आहे. ही सर्व मंडळी महायुतीमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळेलच याची शाश्वती नाही. त्यातच खटावच्या महेश शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर अप्रत्यक्षरित्या दावा केला आहे. कोरेगाव गतवेळी शिवसेनेकडे होता. यावेळी जर कोरेगव भाजपकडे गेला तर माण भाजप, स्वाभिमानी, रासप की शिवसेना यांच्याकडे जाणार याविषयी काहीएक सांगता येत नाही. जरी येळगावकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मतदारसंघ इतरांकडे गेला तर काय..? असा मुद्दा उपस्थित होतोय.
सर्किट हाऊसबाहेर फेऱ्या...
विनोद तावडे यांनी सातारा येथे पत्रकारांशी संवांद साधला आणि पुढील कार्यक्रमाला गेले. यानंतर राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी चारचाकीतून बाहेरुन फेऱ्या मारत होता. कऱ्हाड तालुक्यातील हे महाशय आता भाजपवासी होण्यासाठी निघाले आहेत. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांचा त्यांना विरोध असल्यामुळे त्यांची चांगलीच गोची झाली आहे. पक्षप्रवेश त्यांच्यासाठी निमित्त असले तरी त्यांच्या मनातील खदखद ही राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबतीत आहे. ती खदखद व्यक्त करण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश हवा आहे. त्यांना बाकी काही नको आहे म्हणे. दरम्यान, जावळी विकास आघाडीच्या माध्यमातून सातारामधून शड्डू ठोकलेल्या जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनीही तावडे यांची भेट घेतली.