पाणी आणणे हीच खरी शंकररावांना श्रध्दांजली

By Admin | Updated: August 25, 2015 23:50 IST2015-08-25T23:50:59+5:302015-08-25T23:50:59+5:30

रामराजे नाईक-निंंबाळकर : कोरेगाव येथील कार्यक्रमात पाणीप्रश्नी एकत्र येण्याचे आवाहन

To bring water is really a tribute to Shankarrao | पाणी आणणे हीच खरी शंकररावांना श्रध्दांजली

पाणी आणणे हीच खरी शंकररावांना श्रध्दांजली

कोरेगाव : ‘दुष्काळी भागातील पाणी प्रश्नाकडे दिवंगत शंकरराव जगताप यांनी राजकीय प्रश्न म्हणून कधीच पाहिले नाही. त्यांना पाणी प्रश्नाची ओढ होती. सर्वांनी पक्ष विरहीत आणि गट-तट विसरुन एकत्रित येऊन पाणी प्रश्न सोडविणे हीच खरी त्यांना श्रध्दांजली ठरेल,’ असा विश्वास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.
विधानसभेचे माजी अध्यक्ष शंकरराव जगताप यांचा तृत्तीय पुण्यस्मरण दिन कोरेगाव एज्युकेशन सोसायटीतर्फे विविध उपक्रम आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. सुनीता जगताप होत्या. आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, मुंबई बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर-पाटील, उपाध्यक्ष भीमराव पाटील, पंचायत समितीचे उपसभापती अर्जून वीर, छत्रपती संभाजी महाराज समुहाचे प्रमुख सुरेश साळुंखे, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शहाजी भोईटे उपस्थिते होते.
रामराजे म्हणाले, ‘खरे तर शंकरराव जगताप हे आमच्या वडिलांचे मित्र, त्यांना जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष असताना पहिल्यांदा पाहिले होते. १९९५ मध्ये सर्वात पहिल्यांदा आमदार झाल्यावर त्यांच्याशी परिचय झाला. त्यांनी आम्हाला बरोबरीने वागविले. पाणी या विषयावर आमचे ते नाते जडले. त्यांनी वैचारिक धनाची शिदोरी प्रत्येकाला दिली. त्यांचे दुष्काळी भागातील पाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र येऊ या.
आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिवंगत शंकरराव जगताप यांच्या दुष्काळातील पाझर तलाव निर्मिती आणि रस्त्यांच्या जाळ्यांचे कौतुक करत, असा आमदार होणे नाही, असे स्पष्ट केले. अण्णांनी कार्यकर्त्यांचे जाळे विणले.’
अ‍ॅड. सुनीता जगताप म्हणाल्या, ‘आण्णांना नेहमी दुष्काळी भागाची काळजी होती. त्यांनी विविध पदे भूषविली, मात्र त्यामध्ये दुष्काळी जनतेची कामे करण्याकडे पुढाकार होता. त्यांनी पाझर तलाव निर्मिती, रस्ते या मूलभूत गरजांसह कोरेगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना करत ज्ञानगंगोत्री खेडोपाडी पोहोचविली. गरिबांच्या मुलांना अग्रक्रमाने शिक्षण दिले. शिक्षण संस्था चालविताना, त्यांना किती अडचणी आल्या, याचा विचार केला तर मन हेलावून जाते.’
भीमराव पाटील यांनी प्रास्ताविकात आण्णांच्या कार्याला उजाळा दिला. त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, अशी भूमिका विषद केली.
प्रमुख पाहुण्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेचे खजिनदार दत्तात्रय महाजन यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: To bring water is really a tribute to Shankarrao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.