कोविडमुळे दोन्ही पालक गमवलेल्या बालकांची माहिती द्यावी : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST2021-05-22T04:36:14+5:302021-05-22T04:36:14+5:30
सातारा : कोविड-१९ या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा बालकांची माहिती ...

कोविडमुळे दोन्ही पालक गमवलेल्या बालकांची माहिती द्यावी : जिल्हाधिकारी
सातारा : कोविड-१९ या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा बालकांची माहिती नागरिकांनी १०९८ या चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमविलेल्या बालकांच्यासंबंधी सुरक्षितेबाबत व दोन्ही पालक गमविलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन व उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल स्थापन करण्यात आलेली आहे. या कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या प्रभारी सचिव व्ही. जी. उपाध्य, अप्पर अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा संरक्षण अधिकारी चेतन भारती यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोविड-१९ या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची तपशीलवार माहिती उपलब्ध करून घ्यावी, अशा सूचना करून जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि बालकल्याण समिती यांच्यामार्फत त्यांचे आर्थिक व मालमत्ताविषयक तसेच कायदेविषयक हक्क मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी. या बालकांना आवश्यकतेनुसार बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात यावा. या बालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करावी व दत्तक प्रक्रियेची आवश्यकता असल्यास प्रचलित मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या.