बोलेमामांनी पेरलेला स्नेह अंकुरला!
By Admin | Updated: September 13, 2014 00:01 IST2014-09-13T00:00:18+5:302014-09-13T00:01:20+5:30
मदतीचा ओघ सुरू : हातावरचे पोट असणाऱ्या भाजीविक्रेत्यांनी घेतला पुढाकार

बोलेमामांनी पेरलेला स्नेह अंकुरला!
सातारा : कष्ट आणि प्रामाणिकपणाने व्यवसाय करून अनेकांच्या गळ््यातला ताईत बनलेले चंद्रकांत बोले यांच्या कुटुंबीयांवर मायेचे छत्र धरण्यास हातावरचे पोट असणारे सामान्य लोक सर्वांत आधी सरसावले. ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनानंतर बोले कुटुंबीयांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला असून, मामांनी पेरलेल्या स्नेहाला अंकुर फुटले आहेत.
गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी भिंत कोसळून बोलेमामांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या चार मुलींनी दु:खातून सावरून मामांचा व्यवसाय जिद्दीने नावारूपाला आणण्याची प्रतिज्ञा केली आहे. त्यासाठी सातारकरांनी आर्थिक आधार द्यावा, असे आवाहन ‘लोकमत’ने करताच मदतीचा ओघ सुरू झाला. भाजी विकून पोट भरणाऱ्या मंडळींनी समर्थ भाजीविक्रेता संघटनेतर्फे बोले कुटुंबीयांना अकरा हजारांची मदत दिली. रवींद्र कांबळे, बबन जाधव, राहुल घाडगे, पुष्पा कांबळे, राजश्री पाटील, कमल घाडगे, शालन नावडकर, मारुती सावंत, बबलू केंडे, संपत रासकर, तुळशीराम रासकर, जगन साळुंखे, जयवंत मोरे, जितेंद्र लवळे, महेश दीक्षित, अमोल पवार, प्रशांत फडतरे, संतोष कुंभार राजे, प्रदीप कांबळे, संजय पवार, गणेश खाटपे, अंकुश राजे, नीलेश सावंत, रमेश गवळी, दिलीप म्हस्के, दस्तगीर बागवान, किरण पाटेकर उपस्थित होते. दरम्यान, नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एका महिलेने साडेचार हजारांची मदत दिली. (प्रतिनिधी)