ऐतिहासिक, राजकीय नकाशांवर कोरलेले भुर्इंज!
By Admin | Updated: March 5, 2016 00:07 IST2016-03-04T22:19:37+5:302016-03-05T00:07:55+5:30
शौर्य-चातुर्याचा मिलाफ : मेंदू अन् मनगटाच्या ताकदीवर दृढविश्वास असलेली स्वामिनिष्ठ माणसं अर्थात ‘सीकेपी’

ऐतिहासिक, राजकीय नकाशांवर कोरलेले भुर्इंज!
राहुल तांबोळी-- भुर्इंज -पुणे-बेंगलोर महामार्गावर वसलेलं भुर्इंज गाव आता प्रगतीच्या अनेक खुणा मोठ्या दिमाखाने मिरवत प्रगतीच्या दिशेने घोडदौड करत आहे. या प्रगतिमान वाटचालीत माजी कॅबिनेट मंत्री प्रतापराव भोसले यांचे योगदान मोलाचे आहे.
प्रतापराव भोसले राजकारणात आले आणि या गावच्या प्रगतीचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला. तत्पूर्वी या गावात कुठलीही बँक अथवा पोस्ट कार्यालयही नव्हते. आजमितीला या गावात राष्ट्रीयकृत, सहकारी बँका व पतसंस्थांची संख्या दहा झाली आहे. या सर्व बँका, पतसंस्थांमध्ये ठेवीची रक्कमच सुमारे दोनशे कोटींची आहे.ज्या-ज्या बँका, पतसंस्थांमध्ये लॉकर आहे, ते सर्व लॉकर वापरत आहेत. या एका घटनेवरून गावची समृद्धी अधोरेखित होते.
गावात पिण्याच्या पाण्याची सोय मुबलक आहे. अपवाद वगळता सर्व ठिकाणी उत्तम रस्ते, सांडपाणी व्यवस्था आहे. ग्रामपंचायत असूनही कचऱ्याची विल्हेवाट घंटागाडीद्वारे लावली जाते. या गावची बाजारपेठही चांगलीच विस्तारली आहे. गावच्या लोकसंख्येने आता वीस हजारांचा टप्पा ओलांडला आहे. निकोप सामाजिक वातावरण आणि सामाजिक सलोखा तसेच मुबलक पाणी, दळणवळणाची सोय आदी कारणांमुळे या गावात स्थायिक होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या घडीला या गावात सुरू असणारे आठ गृहप्रकल्प हे त्याचे द्योतक आहे.
संपूर्ण राज्यात एखाद्या वाडीची, उपनगराची लोकसंख्या ३५० झाली की स्वतंत्र ग्रामपंचायत होते. मात्र, भुर्इंज हे एकमेव गाव असे आहे की, या गावापासून तुटून आजतागायत एकही नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आली नाही. भुर्इंज ग्रामपंचायत आता ७५ वर्षांची झाली आहे. मात्र, या गावाचाच अविभाज्य भाग म्हणून बदेवाडी, मालदेववाडी, भिरडाचीवाडी, वारागडेवाडी, चिळणेवाडी, वरचे चाहूर, खालचे चाहूर आणि सर्व उपनगरे एकोप्याने नांदत आहेत.
गावात दुचाकी-चारचाकींचे प्रमाण अधिक आहे. जेसीबी, ट्रॅक्टर यांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. गावातील शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे बागायती असून, नगदी पिके येथे मोठ्या प्रमाणावर घेतली जाते.
बारा वर्षांपूर्वी जेंव्हा किसन वीर कारखान्याची सूत्रे मदनदादा भोसले यांच्याकडे आली. तेव्हापासून भुर्इंजचे नाव औद्योगिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत आहे.
किसन वीर उद्योग समूहाच्या माध्यमातून गावातील शेकडोजणांना रोजगार तसेच ऊस वाहतुकीच्या माध्यमातून व्यवसाय उपलब्ध झाला आहे. किसन वीर कारखाना भुर्इंजमध्ये व्हावा आणि धोम धरणाची उभारणी या दोन्ही प्रकल्पांच्या उभारणीत प्रतापराव भोसले यांचे योगदान मोलाचे राहिले. त्यामुळेच या गावाचा चेहरामोहरा खऱ्या अर्थाने विकासाभिमुख झाला आहे. गावात मतभेद असले तरी मतभेद होऊ नयेत, याची खबरदारी गाव कारभाऱ्यांकडून घेतली जाते, तशी शिकवण इथल्या नेतृत्वाने दिली आहे.
भोसले, जाधवराव कुटुंबीयांचे योगदान मोलाचे
गावाला अध्यात्मिक वारसा उज्ज्वल आहे. भृगुऋषींची येथे समाधी आहे. सद्गुरू नारायण महाराज यांनी या समाधीचा जीर्णोद्धार ग्रामस्थांच्या सहकार्याने केला. ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर आणि घाट परिसर विकासाचे भलेमोठे काम येथे सुरू आहे. गावाला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा लाभली असून, जाधवराव कुटुंबीयांनी दिलेल्या जागेतील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात आणि माजी आमदार मदन भोसले यांनी स्थापन केलेल्या महालक्ष्मी शिक्षण संस्थेत सुमारे ३,५०० विद्यार्थी शिकत आहेत.