उपसरपंचपदासाठी सर्वच सदस्यांचे गुघड्याला बाशिंग
By Admin | Updated: August 26, 2015 21:22 IST2015-08-26T21:22:02+5:302015-08-26T21:22:02+5:30
नऊच्या नऊ इच्छुक : तिढा काही सुटता सुटेना; सरपंचपद रिक्त

उपसरपंचपदासाठी सर्वच सदस्यांचे गुघड्याला बाशिंग
मलकापूर : नांदलापुरात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाच्या आरक्षित उमेदवाराचा पराभव झाल्याने सरपंचपद रिक्त राहणार आहे. उपसरपंच गावाचा कारभारी ठरणार असल्यामुळे सर्व नऊच्या-नऊ सदस्य कारभाऱ्याच्या शर्यतीत उतरले आहेत. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या निवडीवेळी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.नांदलापूर ग्रामपंचायतीमध्ये नुकतीच निवडणूक झाली. मात्र, वॉर्ड आरक्षण सोडतीत कोणत्याच वॉर्डमध्ये अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण पडले नाही; मात्र सरपंचपद अनुसूचित जाती-जामातीसाठी आरक्षित आहे. त्यानुसार वॉर्ड क्रमांक १ मध्ये ओपन जागेवर अनुसूचित जातीच्या उमेदवारास दोन्ही गटांनी उमेदवारी दिली होती. मात्र मंदा शिर्के, शशिकला शिर्के व रमेश शिर्के हे निवडून आले. नांदलाईदेवी वॉर्ड क्रमांक दोन मधून ओ. बी. सी. पुरुष गटातून योगेश शिर्के, माधुरी चव्हाण ओपन महिला, जालिंदर डिसले तर हनुमान वॉर्ड क्रमांक ३ मधून जयसिंग लावंड ओपन पुरुष, योगिता कचरे ओपन महिला, ज्योती वास्के ओ. बी. सी. महिला हे निवडून आले.
मात्र प्रभाग १ मध्ये सरपंचपदासाठी उभे केलेले अनुसूचित जातीचे उमेदवार पडल्याने कोणत्याही गटाला सरपंचपदाचा सदस्य नाही. त्यामुळे येथील सरपंचपद रिक्तच राहणार, हे सिद्ध झाले आहे. गुरुवारी गाव कारभारी म्हणून उपसरपंचपदाची निवड होणार आहे. या निवडीसाठी गेल्या पंधरा दिवसांत मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र आजतागायत उपसरपंचपदाचा कारभारी निश्चित झालेला नाही. निवडून आलेले सर्वच्या सर्व नऊ उमेदवार गावकारभाऱ्याच्या शर्यतीत असल्याचीच चर्चा गावात सुरू
आहे. जर नऊच्या नऊ सदस्य उपसरपंच पदासाठी इच्छुक असतील व त्यांनी सर्वांनी त्या पदासाठी अर्ज भरले तर कोण कोणाला निवडून देणार, हा प्रश्न गंभीर झाला असून, स्वत:चे मत दुसऱ्याला कसे देणार, असा तिढा निर्माण झाला आहे. तो तिढा सोडविण्यात कोणत्याही गटाला किंवा उमेदवाराला यश आलेले नाही. (प्रतिनिधी)
आरक्षण बदलण्याची मागणी
गावात निवडून आलेल्या सदस्यांमध्ये अनुसूचित जाती-जमातीचा एकही सदस्य नाही. फेरनिवडणुकीचा खर्च व प्रक्रिया विचारात घेता सरपंचपदाचे आरक्षणच बदलून द्यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहोत, असे जयसिंग लावंड यांच्यासह सर्व सदस्यांनी सांगितले.