बॅँकांनी प्राथमिक क्षेत्राच्या कर्ज वाटपास प्राधान्य द्यावे

By Admin | Updated: September 26, 2014 23:32 IST2014-09-26T22:46:42+5:302014-09-26T23:32:52+5:30

अश्विन मुदगल : खरिपासाठी १०२४.३२ कोटींचे पीक कर्ज वाटप

Banks should give preference to primary sector loans | बॅँकांनी प्राथमिक क्षेत्राच्या कर्ज वाटपास प्राधान्य द्यावे

बॅँकांनी प्राथमिक क्षेत्राच्या कर्ज वाटपास प्राधान्य द्यावे

सातारा : ‘जिल्हा अग्रणी बँकेतर्फे २०१४-२०१५ वर्षासाठी तयार केलेल्या पतपुरवठा आराखड्याद्वारे जून २०१४ पर्यंत १६९० कोटी २५ लाखांचे कर्ज वितरण प्राथमिकता क्षेत्रासाठी केले आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने बँकर्स समन्वय समितीची बैठक नियोजन भवनात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, जी. श्रीकांत, रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक आर. डब्लू साळुंखे, ‘नाबार्ड’चे सहायक व्यवस्थापक जी. के. साळवेकर, बँक आॅफ महाराष्ट्रचे सहायक महाप्रबंधक रवींद्र चव्हाण, अग्रणी बँक व्यवस्थापक संजय वाघ, प्रकल्प संचालक गिरीश भालेराव, मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा, स्टेट बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक विजय शानबाग, आयडीबीआय बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक अनिल गोडबोले व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप धरू आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘सर्व बँकांनी पतपुरवठा आराखड्याद्वारे जून तिमाही अखेर ११७ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. सर्व बँकांनी या वर्षात प्रत्येक तिमाहीत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न करण्याविषयी सूचना देण्यात आल्या. प्रधानमंत्री जन धन योजना विहित मुदतीत यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व बँकांनी प्रयत्न करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. खरीप उद्दिष्टाच्या ९४ टक्के काम बँकांनी साध्य केले आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, ‘सध्या पाऊस अपेक्षेप्रमाणे झाला असून, बँकांनी पुढील रब्बी हंगामात आतापासूनच नियोजन करून प्राधान्याने पीक कर्ज वाटप करावे.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जी. श्रीकांत यांनी नवीन राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती योजनांबद्दल माहिती देऊन सर्व बँकांनी योजनेंतर्गत यावर्षी बचतगटांचे उद्दिष्ट साध्य करण्याविषयी सूचना दिल्या. गिरीश भालेराव यांनी या योजनेचा आढावा घेतला. रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले.
प्रास्ताविकात जिल्ह्यातील बँकांनी केलेल्या प्रगतीचा उल्लेख करून आर्थिक सामिलीकरण व रिझर्व्ह बँक व केंद्र शासनाच्या निर्णयानुसार बँकांनी शाखांच्या सेवा क्षेत्रात येणाऱ्या गावामध्ये बँकेचा व्यावसायिक प्रतिनिधी नेमून बँकिंग सेवा त्वरित प्रदान करण्यासाठी बँकांनी पुढाकार घेऊन कार्यवाही करण्याबद्दल सांगितले.
सभेत रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक आर. डब्ल्यू. साळुंखे यांनी लघू उद्योगांना बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्ज द्यावीत व त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागरुकता निर्माण करण्यात यावी, असे नमूद
केले. (प्रतिनिधी)

४,६५५ कोटींचा पतपुरवठा
चालू वर्षासाठी ४,६४४ कोटी ३७ लाखांचा पतपुरवठा प्राथमिक क्षेत्रासाठी तयार केला असून, त्यापैकी ३० जून २०१४ पर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी तसेच खासगी बँकांद्वारे १,६९० कोटी २५ लाखांचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे.
शेती क्षेत्रासाठी १,५१६ कोटी २९ लाख, उद्योगासाठी १४ कोटी २४ लाख आणि अन्य प्राथमिक क्षेत्रासाठी १५९ कोटी ७१ लाखांचा कर्ज पुरवठ्याचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
आतापर्यंत करण्यात आलेल्या कर्ज पुरवठ्यात व्यापारी बँकांमार्फत ५१० कोटी ७० लाख, जिल्हा बँकेतर्फे १,१७८ कोटी ६१ लाख, आर. आर. बी. च्या वतीने ९४ लाखांच्या कर्ज पुरवठ्याचा समावेश आहे.

Web Title: Banks should give preference to primary sector loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.