बळीराजाची शेती औजारे महाग
By Admin | Updated: June 18, 2014 01:07 IST2014-06-18T00:55:51+5:302014-06-18T01:07:31+5:30
खरिपाची लगबग : शेतकऱ्यांना पडतोय आर्थिक भुर्दंड

बळीराजाची शेती औजारे महाग
सातारा : खरिप हंगामाच्या येण्याने शेतीच्या कामांना वेग येतो. या वेगाचा स्पिड ब्रेकर ठरली आहेत शेतीसाठी उपयुक्त असणारी औजारे. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे विळा, खुरपं, नांगर, कुळव, पाभर, सारायंत्र, कोळपे यांच्यासह अन्य औजारांच्या किंमतीत वाढ झाली आहे.
शेतकरी आणि शेताशी जिवाचे संबंध असणारी ही औजारे शेतकऱ्यांना वर्षभर उपयुक्त असतात. बऱ्याचदा शेतकरी ही औजारे जून महिन्याच्या सुरूवातीस खरेदी करतात. औजारे लोखंडापासून तयार केली जातात तर त्याची मुठ लाकडापासून तयार होते. पूर्वी गावोगावी लोहार येवून ही औजारे धान्याच्या बदल्यात करून जात होती. अलिकडे ही पध्दत जावून शेतकरी शहरात येवून औजारे खरेदी करू लागले.
बहुतांश नामांकित कंपन्या शेती औजारे तयार करतात. उन्हाळ्यात बांधकामाचे काम पूर्णत्वाकडे जाण्याची गडबड बांधकाम व्यावसायिकांना असते. त्यामुळे या दिवसांत औजारांच्या किंमती चढ्या असतात. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या खिशावर होवू लागला आहे. पण अत्यंत गरजेचे म्हणून याची खरेदी होताना दिसत आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना अवजारे खरेदीसाठी वेळ मिळाला आहे. (प्रतिनिधी)