बाबांनी परजली शस्त्रे
By Admin | Updated: July 13, 2014 22:53 IST2014-07-13T22:46:47+5:302014-07-13T22:53:18+5:30
दक्षिणस्वारीची तयारी : सकाळी शासकीय अन् दिवसभर राजकीय आढावा

बाबांनी परजली शस्त्रे
प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाड
गेले काही महिने मुख्यमंत्र्यांचा होकार ऐकायला आतुर असणाऱ्या समर्थकांना आज दिलासा मिळाला. सकाळी शासकीय आढावा आटोपल्यानंतर त्यांनी दिवसभर राजकीय आढावा घेतला आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कऱ्हाड दक्षिणवर स्वारी करण्यात संकेत देत त्यांनी आपली आगामी राजकीय दिशाही स्पष्ट केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड दक्षिणमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. पण येथून काँग्रेसचा उमेदवार कोण, याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता! विद्यमान आमदार विलासराव पाटील-उंडाळकर आठव्यांदा आखाडात उतरण्याची तयारी करताहेत, तर डॉ. अतुल भोसले काँग्रेसकडूनच लढण्यासाठी मोर्चेबांधणी करताहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही दक्षिणेतून लढावे असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पण स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत मौन बाळगले होते. दिवंगत प्रेमलाताई चव्हाण व आनंदराव चव्हाण यांच्या जयंतीदिनीही ते कऱ्हाड दौऱ्यावर होते. मात्र, त्यावेळीही उमेदवारीबाबत त्यांनी ‘ब्र’ काढला नाही.
दरम्यान, त्यांच्या रविवारच्या दौऱ्याची मात्र समर्थकांनी जोरदार तयारी केली होती. जखिणवाडी येथे कऱ्हाड ग्रामीणच्या कार्यकर्त्यांचा जनता दरबार, रात्री एका हॉटेलात व्यापारी असोसिएशनच्या वीसहून अधिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा अन् प्रीतिभोजन. या साऱ्या धावपळीत मक्का मस्जिदमध्ये इफ्तार पार्टीलाही हजेरी!
सकाळी विमानतळावरच त्यांच्या स्वागताला आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते जयवंत जगताप, पंचायत समितीतील विरोधी पक्षनेते धोंडीराम जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांची फौज दाखल होती.
मुख्यमंत्री शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घ्यायला लागल्यावर ही फौज जखिणवाडीकडे पोहोचली. तेथे कऱ्हाड दक्षिणेतील सुमारे ७५ गावांतील शेकडो कार्यकर्ते हजर होते. या प्रत्येकाशी बाबांनी सुमारे चार तास संवाद साधला. त्यामुळे गावोगावचे कार्यकर्ते सुखावले. संवाद साधताना ‘तुमच्या गावाला माझ्याकडून काही विकासनिधी मिळाला का,’ अशी विचारणा करून आणखी काय मागण्या आहेत, हे त्यांनी जाणून घेतले. प्रत्येकाला नावानिशी हाक मारली आणि नव्या कार्यकर्त्यांची ओळखही करून घेतली. त्यांची देहबोलीच दक्षिणेवरील स्वारीचे संकेत देत होती. आणि शेवटी पत्रकार परिषदेतही त्यांनी मौन सोडले.