पोलीस दलाकडे जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन हुतात्म्यांमुळे बदलला
By Admin | Updated: November 28, 2014 00:15 IST2014-11-27T21:59:12+5:302014-11-28T00:15:25+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिपादन

पोलीस दलाकडे जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन हुतात्म्यांमुळे बदलला
भुर्इंज : ‘सातारची भूमी ही शूरवीरांची भूमी आहे. इथल्या मातीने क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांच्यासारख्या रत्नांबरोबरच २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यात अजमल कसाब सारख्या दहशतवाद्याला पकडणाऱ्या हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्यासारखा धाडशी पोलीस अधिकारीही दिला आहे. या वीरांनी राज्यातील जतनेचा पोलीस दलाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला,’ असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केले.
किसन वीर कारखाना कार्यस्थळावर २६/११ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला परतवून लावताना आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन, मानवंदना आणि संविधान दिन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, भुर्इंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची उपस्थिती होती.
देशमुख म्हणाले, ‘तुकाराम ओंबळेंनी कसाबला पकडले नसते, तर मुंबईत आणखी लोक मारले गेले असते. दहशतवाद्यांचे मनसुबे जगाला कळले नसते. ओंबळेंनी देशभक्तीने प्रेरित होऊन हिमतीचे काम केले. त्यांच्यासह या हल्ल्यातील हुतात्म्यांचे कल्पनाशक्तीचा योग्य वापर करत उचित स्मारक उभारून मदन भोसलेंनी देशभक्तीतून सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. कारखान्याने उभारलेले हे स्मारक खऱ्या अर्थाने आजच्या तरुण पिढीचे प्रेरणास्थळ आहे.’
प्रारंभी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दल व कारखान्याच्या सुरक्षारक्षकांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली.
यावेळी कारखान्याचे संचालक संचालक नारायणराव पवार, नंदाभाऊ जाधव, हणमंतराव पिसाळ, चंद्रकांत इंगवले, सुभाष साळुंखे, संदीप पोळ, अशोक मोरे, रोहिदास पिसाळ, अॅड. प्रभाकर बर्गे, किसनराव कदम, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, लालसिंग जमदाडे, सचिन साळुंखे, सुनंदा चव्हाण, कार्यकारी संचालक विजय वाबळे, मोहनराव भोसले, प्रल्हाद चव्हाण, बापूसाहेब शिंदे, सतीश भोसले, धनाजी डेरे, प.ना. पोतदार, चंद्रकांत चव्हाण, शंकरराव पवार, नवनाथ केंजळे, बाळासाहेब कांबळे, विलासराव जाधव, मधुकर शिंदे, शिवाजीराव जाधव-पाटील, उपस्थित होते. (प्रतिनिधी)