डाळिंबाच्या बागांवर तेल्या रोगाचे आक्रमण!
By Admin | Updated: June 29, 2015 00:28 IST2015-06-28T22:29:54+5:302015-06-29T00:28:44+5:30
शेतकरी हवालदिल : खर्च जाणार वाया ; फलटण पूर्व भागातील चित्र

डाळिंबाच्या बागांवर तेल्या रोगाचे आक्रमण!
दुधेबावी : फलटण पूर्व भागातील दुधेबावी, भाडळी खुर्द, भाडळी बुद्रुक, तिरकवाडी, वडले, सोनवडी, मिरढे, जावली या गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डाळिंब बागांची लागवड केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला आहे. सध्या या डाळिंब बागांवर तेल्या रोगाच्या प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.दुधेबावी परिसरातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीशी सामना करत डाळिंब बागा फुलवल्या आहेत. या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने या बागांची पाहणी करून या तेल्या रोगाविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांना तज्ज्ञाकडून मार्गदर्शन करावे. सध्यस्थितीत डाळिंब बागा तेल्यामुक्त करणे गरजेचे आहे. उत्पादन वाढीसाठी शासन स्तरावरुन प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.डाळिंब बागेतील एका झाडाला तेल्या रोग झाला तर तो पूर्ण बागेत पसरत आहे. त्यामुळे झाडे मुळासहित काढुन टाकावी लागत आहेत. सुमारे दीड ते दोन वर्षे खर्च करुन वाढवलेली बाग काढुन टाकल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.उन्हाळ्याच्या काळात शेतकऱ्यांनी टँकरद्वारे विकत पाणी घेऊन डाळिंबाची झाडे जगवण्याचे काम केले आहे. त्यावेळी पाण्याचा एक टँकर सुमारे सातशे रुपयाला मिळत होता. तसेच सेंद्रीय व रासायनिक खतेही फळबागांना घातली आहेत. ठिबक सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी सुमारे पंचवीस हजार रुपये इतका खर्च केला आहे.
सध्या शेतकऱ्यांनी डाळिंबाचा मृग बहार घेतला आहे. पावसाचे पाणी कळीवर अथवा फळावर पडून त्यावर टिपका हा रोग पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. (वार्ताहर)
डाळिंबावरील तेल्या रोगावर उपाय काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागात यावर चर्चासत्र घेणे अपेक्षित आहे.
-विकास सोनवलकर, डाळिंबधारक, शेतकरी