अॅथलीट-फौजी-शेतकरी..!
By Admin | Updated: November 2, 2015 23:56 IST2015-11-02T21:16:38+5:302015-11-02T23:56:19+5:30
ही रानवाट वेगळी...

अॅथलीट-फौजी-शेतकरी..!
उत्कृष्ट अॅथलीट म्हणून शालेय आणि महाविद्यालयात बक्षिसे जिंकणारा... पुढे त्याच कौशल्यावर देशसेवेचे व्रत घेऊन फौजेत भरती होणारा... तिथेही उत्कृष्ट काम करून साताऱ्याची मान उंचावणारा जवान अचानक फौज सोडून शेतात राबवण्याचे ठरवितो. त्याच्या या निर्णयाचा धक्का त्याच्या कुटुंबीयांनाही बसतो; पण त्याच्या निर्णयाचे सर्वचजण स्वागत करतात आणि सीमेवर बंदूक घेऊन देश रक्षण करणारे हात काळ्या आईच्या सेवेत यशस्वीपणे रुजतात......
खोजेवाडी, ता. सातारा येथील अजित कृष्णराव देशमुख हा उत्कृष्ट खेळाडू म्हणून सर्वांना परिचित होता. महाविद्यालयात तो ‘एनसीसी’चा उत्तम कॅडेट म्हणून चमकला. शिक्षकांचा आग्रह आणि कुटुंबीयांचा पाठिंबा मिळाल्यामुळे तो सैन्यात भरती झाला. घरी आई सुनंदा वडिलांबरोबर शेती बघत असल्यामुळे अजित सैन्यात रमला होता. पण, शेतीची त्याची हौस त्याला सुटीत स्वस्थ बसू देत नव्हती. सैन्यातून सुगीच्या दिवसांत तो सुटी घ्यायचा. त्यामुळे आई-वडिलांबरोबर शेतात काम करण्याचा त्याला अनुभवही येत होता.
सैन्यात राहून देशसेवा आणि सुटीत धरणी सेवा, असे चक्र सुरू असतानाच अजितच्या वडिलांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात त्याच्या आईला शेतीची कामे करणे अवघड होऊ लागले. त्या दरम्यान मोठा भाऊ गणेश नोकरीच्या निमित्ताने परदेशात होता. त्यामुळे आईची होणारी तारांबळ आणि शेतीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अजित अस्वस्थ झाला. यातूनच त्याने नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेत सैन्य सोडली.
अजितची सध्या सात एकर शेती आहे. त्यातील साडेतीन एकर शेती बागायत आहे. त्यामुळे त्यात तीन एकर ऊस आणि अर्धा एकर आले लावले आहे. यात आल्याचे यंदा तीन लाखांचे उत्पन्न त्याला अपेक्षित आहे. गावातील शेतकऱ्यांना शेती विक्रीपासून परावृत्त करण्यातही अजित आघाडवीर असतो.
साताऱ्यात वास्तव्यास असणारा अजित आता रोज सकाळी खोजेवाडीला शेतात जातो. शेतीतील नवनवीन प्रयोग, उपयुक्त माहिती, खतांचा वापर याविषयी अजित कायम संतोष साळुंखे, अमोल घोरपडे, शिवाजी शितोळे आणि संजय घोरपडे यांच्याशी सल्ला मसलत करतो. त्यातूनच तो बरेच काही शिकला आहे.
शेतात काम करताना धम्माल असते. आपण पेरलेले उगवताना बघतानाचा आनंद काही औरच असतो. गेल्या काही दिवसांत ठिबक सिंचनाच्या माध्यमातून चांगली शेती पिकवत आहे. शेतात बोअर घेतल्यामुळे पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. भविष्यातही परदेशी भाज्या लागवड करण्याचा माझा मनोदय आहे.
- अजित देशमुख,
शेतकरी, खोजेवाडी
प्रगती जाधव-पाटील