देशभरातील साधुसंतांचा मेळा विसावला शाहूनगरीत!
By Admin | Updated: November 9, 2015 23:20 IST2015-11-09T22:57:23+5:302015-11-09T23:20:46+5:30
दोन दिवस मुक्काम : श्री नवनाथ झुंडीच्या साधूंचे सातारकरांनी केले वाजतगाजत स्वागत

देशभरातील साधुसंतांचा मेळा विसावला शाहूनगरीत!
सातारा : साधू संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा असे म्हटले जाते. अखिल भारतवर्षीय भेष वारह पंथ अवधूत संप्रदाय - श्री नवनाथ झुंडीच्या साधूंचे ऐन दिवाळीतच सातारा नगरीत मोठ्या उत्साहात व भक्तिभावात स्वागत झाले. ढोल-ताशांच्या निनादात, पुष्पवृष्टीत, रांगोळ्यांच्या सजावटीत व फटाक्यांच्या आतषबाजीत साधू, महंतांचे शाहूनगरीत स्वागत झाले.
महानुभाव मठाशेजारील श्री नवदुर्गा मंदिरापासून गोरक्षनाथांच्या पादुका घेऊन या साधूंची वाजतगाजत करंजे, प्रतापगंज पेठ, मोती चौक, राजपथ व श्री शनिमारूती मंदिर, शनिवार पेठ या मार्गे मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, शनिमारूती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब ठक्कर, ठाकोरभाई शहा, अण्णा बेंद्रे, किशोर घोडके, किरण गेंगजे यांनी ट्रस्टच्या वतीने साधूंचे स्वागत केले.या साधूंचे दोन दिवस श्री शनि मारूती मंदिर, शनिवार पेठ येथे वास्तव्य असणार आहे. दि. ११ रोजी पुढील मुक्कामी ते जाणार आहेत. यावेळी श्री गोरक्षनाथांच्या पादुकांची पूजा, धुनी प्रज्वलन आदी कार्यक्रम झाले. सातारकरांसाठी हा अभूतपूर्व योग असल्याने साधूंच्या दर्शनासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन बाळासाहेब ठक्कर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
१८०० किलोमीटरची पदयात्रा
श्री नवनाथ झुंडीमध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले या सांप्रदायाचे ४६० साधू सहभागी झाले आहेत. कुंभमेळ्यानंतर त्र्यंबकेश्वर येथून कदली मठ (मेंगलोर) कर्नाटक येथे श्री नवनाथ झुंडी सांप्रदायाच्या साधूंची पदयात्रा चालली आहे. या साधूंची ही १८०० किलोमीटर अंतराची पदयात्रा असून या पदयात्रेचा आरंभ नागपंचमीच्या दिवशी १९ एप्रिल २०१५ झाला आहे. ७ मार्च २०१६ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी ही पदयात्रा कदली मठ येथे पोहोचणार आहे. एकूण ९३ मुक्कामांमध्ये ही पदयात्रा होणार असून सातारा शहरातील मुक्काम हा ३९ वा टप्पा असल्याचे नवथान झुंडीच्या साधूंनी सांगितले.
शनिमारुती मंदिर येथे वास्तव्य
दर १२ वर्षांनंतर अशा पध्दतीची ही पदयात्रा होत असून याला हजारो वर्षांची परंपरा असल्याचे साधूंनी सांगितले. सातारा शहरातील शनिमारूती देवस्थानाला या सांप्रदायामध्ये विशेष महत्त्व असल्याने सातारा शहरातील दोन दिवसांचा मुक्काम याच ठिकाणी होणार असल्याचे साधूंनी सांगितले.