सेनेची डरकाळी नव्हे म्याँव...!
By Admin | Updated: June 26, 2016 00:35 IST2016-06-26T00:26:07+5:302016-06-26T00:35:01+5:30
सुनील तटकरे : जलयुक्त शिवारमधून भाजपने ठेकेदार पोसल्याचा आरोप

सेनेची डरकाळी नव्हे म्याँव...!
सातारा : ‘शिवसेना डरकाळी फोडण्याचा आव आणत आहे; परंतु प्रत्यक्षात त्यांचे म्याँव...म्याँव सुरू आहे. सध्या असलेल्या राजकीय परिस्थितीमुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस दाखवू शकत नाही,’ अशी सडेतोड टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
‘कोल्हापूर येथे जात असताना तटकरे यांनी शनिवारी दुपारी साताऱ्यातील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेतली. राज्यातील जनतेने मोठ्या अपेक्षेने सत्तेत परिवर्तन केले; परंतु जनतेची अपेक्षापूर्ती करण्याऐवजी एकमेकांचे वस्त्रहरण सुरू आहे. हिंंदुत्ववादासाठी ओळखले जाणारे दोन्ही पक्ष आज वेगळीच भाषा बोलत आहेत. एकमेकांची निंदानालस्ती करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष द्यावे,’ असा सल्लाही तटकरे यांनी शिवसेना नेत्यांना दिला.
राज्यात सलग दोन वर्षे दुष्काळ असताना आणि राज्यासमोर विविध प्रश्न असताना सत्तेतील दोन्ही पक्ष एकमेकांची जाहीरपणे निंदानालस्ती करीत आहेत. त्यामुळे राजकीय मनोरंजन होत असले तरी लोकांमध्ये सरकारबद्दल तिरस्काराची भावना निर्माण होत आहे. राज्याची परंपरा, सभ्यता याला मूठमाती देण्याचा प्रयत्न होत आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे सांगत यापुढे धर्मनिरपेक्ष पक्षाची आघाडी करावी, नाहीतर विरोधी पक्षात बसावे, अशा सूचना स्थानिक पातळीवरही देण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. कोणत्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, सदस्य, कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतील तर पक्षातंर्गत मतभेद दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या दोन वर्षांत प्रबळ विरोधक म्हणून काम केल्याचा दावा करीत दुष्काळ, महागाई, परीक्षा शुल्क यासह विविध प्रश्नांवर आंदोलन केल्याचेही त्यांनी सांगितले. रस्त्यावरच्या आंदोलनाबरोबरच विधिमंडळातही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आक्रमकपणे राष्ट्रवादीने भूमिका मांडल्याचेही त्यांनी सांगितले. ‘जलयुक्त शिवार’ योजनेतून भाजपनेच ठेकेदारांना पोसण्याचे काम केल्याचा आरोप करीत येत्या अधिवेशनातही आक्रमक भूमिका घेऊ, असा इशारा दिला. ‘स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये तरुणांना संधी देण्याची सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली असून, त्याप्रमाणे गुणवत्तेवर संधी देणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने लढविणार असून, या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी क्रमांक एकवर राहील,’ असेही तटकरे यांनी सांगितले.
सत्ताधारी दोन्ही पक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण त्याचबरोबर ताळमेळ नसून गोंधळलेली स्थिती असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीची ध्येयधोरणे, वैचारिक मत स्पष्ट असून, त्यानुसारच आगामी निवडणुका लढविल्या जातील. ३१ जुलैपर्यंत प्रत्येक जिल्ह्याचे प्रभारी तालुकानिहाय दौरा करणार असून, आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये सहा महसूल विभागांमध्ये विभागनिहाय मेळावे होणार असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब महामूलकर, जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)