अंगारकीचा चंद्रोदय नवविचारांचा!
By Admin | Updated: July 16, 2014 01:22 IST2014-07-16T01:18:56+5:302014-07-16T01:22:48+5:30
विविधांगी प्रबोधन : खिंडीतील गणपती देवस्थानात भक्तांना समजले शाडूमूर्तीचे महत्त्व

अंगारकीचा चंद्रोदय नवविचारांचा!
सातारा : अंगारकी चतुर्थीनिमित्त खिंडीतील गणपतीच्या मंदिराकडे नेहमीप्रमाणे हजारो भक्तांची पावले वळली. परंतु या अंगारकीला श्रींच्या दर्शनाबरोबरच भक्तांना मिळत होते पर्यावरणपूरक गणेशोत्सवातील आपल्या जबाबदारीचे भान. उपवास सोडण्यापूर्वी भक्तांनी चंद्रदर्शनही घेतले; मात्र आजचा चंद्रोदय त्यांना नवविचार देणारा ठरला.
मंगळवार तळ्यात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यामुळे प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, यावर्षी ‘लोकमत’सह विविध व्यक्ती, संस्था, मंडळे आणि सातारा पालिकाही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आग्रह धरून तसा विचार रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहे. मंगळवार तळे मित्रसमूह हा त्यातीलच एक जनसमूह. गणेशोत्सव सुरू होण्याच्या सुमारे एक महिना आधी आलेल्या अंगारकी चतुर्थीचा याकामी उपयोग करून घेण्याचे या मंडळींनी ठरविले.
अंगारकीला खिंडीतील गणपती देवस्थानला सुमारे चार ते पाच हजार भाविक दर्शनासाठी येतात. या पायरी मार्गावर मंडळींनी मातीच्या गणपतीचे आणि पर्यावरणाचे महत्त्व सांगणारे बारा फलक लावले. प्रदक्षिणामार्गावरही चार फलक उभे केले.
‘यंदा बाप्पा शाडूचाच आणणार, विसर्जनही घरीच करणार, निर्माल्याचे खत बनविणार, आपला परिसर सुंदर बनविणार’, ‘करूया स्वागत इको फ्रेन्डली गणेशाचे, करूया निर्मूलन प्रदूषणाचे, वैभव जपूया साताऱ्याचे’, तसेच ‘प्लास्टर आॅफ पॅरिस नको की रासायनिक घातकी रंग नको, आयुष्याला प्रदूषणाचा फास नको,’ असे संदेश या फलकांवर झळकत होते.
सायंकाळी भक्तांची संख्या वाढली. त्यावेळी कार्यकर्ते पायरीमार्गावर उभे राहिले. ‘केवळ संकल्प नाही, आहे दृढनिर्धार’ असे शीर्षक असणारी सुमारे हजार पत्रके त्यांनी भक्तांना वाटली.
मंगळवार तळे मित्रसमूहाचे राजेश माने, नंदकुमार देवरुखकर, जितेंद्र भिसे आणि इतर सुमारे पंचवीस कार्यकर्ते घरोघर जाऊन यासंबंधी प्रबोधन करीत आहेत. आतापर्यंत ते तळे परिसरातील १६ अपार्टमेंट््ससह सातशे घरांमध्ये पोहोचले आहेत. (प्रतिनिधी)