गळतीच्या पाण्याचा शिवतीर्थाला वळसा
By Admin | Updated: November 28, 2015 00:11 IST2015-11-27T20:46:11+5:302015-11-28T00:11:37+5:30
पालिकेचे दुर्लक्ष : परिसरात दुर्गंधी; पादचाऱ्यांसह वाहनधारकांची डोकेदुखी वाढली

गळतीच्या पाण्याचा शिवतीर्थाला वळसा
सातारा : सातारकरांचे मानाचे पान असणाऱ्या पोवई नाक्यावरील शिवतीर्थाच्या परिसराला गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त गळतीच्या पाण्याचा वळसा पडताना पाहायला मिळतो आहे. पालिकेने आयडीबीआय बँकेसमोर बांधलेल्या बहुचर्चित दुभाजकाला ओलांडून हे पाणी शिवतीर्थाकडे जाऊन दुर्गंधी पसरली असली तरी पालिका अद्यापही गांधारीच्या भूमिकेत आहे.
रयत शिक्षण संस्थेपासून पोवई नाक्याकडे जात असताना शाहूनगरला जाणाऱ्या फाट्याजवळच रस्त्याच्या मध्यभागी उपळा लागल्याप्रमाणे पाणी वर येत आहे. तिथून उताराने ते मरिआई कॉम्प्लेक्सच्या समोरून शिवतीर्थाकडे वाहत जाते. रस्त्याकडेची पार्किंगची जागा, रिक्षा स्टॉप या परिसरातील सखल भागात हे पाणी साठून राहत आहे. शिवतीर्थाला वळसा घालून हे पाणी सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जात आहे.
या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरली असून, व्यावसायिकांना नाकाला रुमाल लावूनच व्यवसायाच्या ठिकाणी बसावे लागत आहे. तसेच रस्त्यावरून जाणारे पादचारीही त्रस्त झाले आहेत. शिवतीर्थ हे सातारकरांसाठी पूजनीय आहे. पण याच पूजनीय ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी जात असताना पालिकेने डोळे मिटून घेतले आहेत.
येथीलच एका हॉटेलातील ड्रेनेजच्या पाईपलाईनला गळती लागल्याचे नागरिकांची तक्रार आहे; परंतु पालिकेने या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकार सुरु असतानाही पालिका हातावर हात धरुन बसली आहे. एसटीने साताऱ्यातील पोवईनाक्यावरुन जाणाऱ्या परजिल्ह्यातील नागरिकांकडूनही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाहतूक शाखेचे पोलीसही याच घाण पाण्यात उभे राहून आपली सेवा बजावत आहेत. (प्रतिनिधी)
घोटाभर पाण्यातून लोकांची वारी!
पावसाळ्यात ज्याप्रमाणे पोवई नाक्यावरून पाण्याचे लोट वाहत असतात, त्याचप्रमाणे सध्या हे पाणी वाहून जात आहे. त्यामुळे घोटाभर पाण्यातून नागरिकांना जावे लागते. परंतु हे पाणी बाधक ठरून लोकांना त्वचाविकाराला सामोरे लाण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून हे पाणी वाहत आहे. लोकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत असले तरी पालिकेने कारवाई केलेली नाही. शिवतीर्थावर हे दुर्गंधीयुक्त पाणी जात असल्याने लोक संतप्त झाले आहेत.
- संतोष जांभळे