युती शासनाची सावध पावले!

By Admin | Updated: November 23, 2015 00:24 IST2015-11-22T21:35:11+5:302015-11-23T00:24:05+5:30

नगरपंचायतीबाबत आघाडीची घोषणा : वडूजला १७ सदस्य; १२ हजार मतदार--गाव होतंय मोठं - तीन

Alliance government's cautious steps! | युती शासनाची सावध पावले!

युती शासनाची सावध पावले!

शेखर जाधव -- वडूजगेल्या आघाडी सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. त्याच धर्तीवर शासनाकडून नगरविकास आराखडा तयार करण्याच्या कामाला गती प्राप्त झालेली होती. मात्र, युतीच्या काळात याबाबत साधव पावले उचलली जात आहेत. तरीसुद्धा खटाव तालुक्याची राजधानी म्हणून वडूज ग्रामपंचायत नगरपंचायतीच्या प्रशासकीयदृष्ट्या वाटेवर आहे.
वडूजची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार १७ हजार ६३६ असून, एकूण मतदार १२ हजार २८७ इतके आहेत. १७ ग्रामपंचायत सदस्य असणारी वडूज ग्रामपंचायतीला नागरिकांना सोयी देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण तालुक्याचे मुख्यालय वडूज शहरातील लोकसंख्या सध्या सुमारे २५ हजारांच्या वर असून, मतदारांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. तसेच वडूज शहरात सर्वच प्रशासकीय कार्यालये, एसटी आगार, जिल्हा न्यायालयासहित कॉलेज, शाळा, प्रशाला, मंगल कार्यालये, हॉटेल्स आणि दवाखाने यामुळे तालुक्याच्या टोकाहून ये-जा करणाऱ्यांची वर्दळ प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. त्यापटीत येथील ग्रामपंचायतीला नागरिकांची सोय करताना आर्थिकदृष्ट्या अनंत अडचणी येत आहेत. यासाठी वडूज ग्रामपंचायत तत्काळ नगरपंचायत होणे काळाची गरज बनली आहे.
सध्या ग्रामपंचायतीकडून नगरपंचायत इतकीच घरपट्टी व पाणीपट्टी वसूल केली जात आहे; मात्र शहराची व्याप्ती पाहता हा आर्थिक ताळेबंद व खर्चाची बाजू पाहता फार कठीण होऊन बसले आहे. घरफाळा आकारणी करताना कौलारू घर, सिमेंट पत्र्याचे घर, दगड-मातीचे घर, आरसीसी, लोडबेरिंग यासह आदी प्रकारात मोडणाऱ्या घरांचा घरफाळा वेगवेगळ्या पद्धतीत आहे. एक दिवसाआड सुटणारे पाणी याचे मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. कचऱ्याचे निर्मूलन व्यवस्थितरीत्या होत नाही.
तसेच इतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आत्तापर्यंत ग्रामपंचायतीने इच्छाशक्तीच्या जोरावर येईल त्या प्रसंगाला सामोरे जात या सर्व अडचणींवर मात केलेली आहे. परंतु प्रचंड आर्थिक ओढाताण झाल्याने प्रसंगी पाणीपुरवठा करणारा विद्युतपुरवठा वीजबिल थकितामुळे बंद अवस्थेत राहिला आहे.
त्यामुळे आता शहराची व्याप्ती पाहून व सोयी-सुविधा देताना होणारी कसरत याचा भार न सोससल्यामुळे ग्रामपंचायतीची नगरपंचायत व्हावी, यासाठीही काही सदस्य आग्रही
आहेत. (समाप्त)

क्लॉक पद्धतीने प्रभागरचना...
नगरविकास आराखडा तयार झाल्यानंतर प्रारंभी क्लॉक (घड्याळ) पद्धतीने प्रभागरचना होऊन अंदाजे ८०० ते १००० मतदार असणाऱ्यांचा एक प्रभाग पडणार आहे. शहराच्या नकाशावरून मुख्य रस्ते व गल्ली बोळातील अंतर्गत रस्त्यांचा विचार करून प्रभाग रचना होणार आहे. नगरपंचायत झाल्यानंतर नगरविकास विभागाकडून प्रारंभी क्रीडांगण, सभागृह, शाळा व इतर प्रमुख कारणांसाठी लागणाऱ्या जागा आरक्षित केल्या जाणार आहेत. सध्या असणाऱ्या १७ सदस्यांऐवजी २३ नगरसेवक संख्या ही नगरपंचायतीवेळी होऊ शकते. नगरपंचायतीस नगरविकास अधिकारी नेमणूक होईपर्यंत प्रशासक म्हणून तहसीलदार तर सचिव म्हणून ग्रामसेवक काम पाहतात.

विकासाचे प्रश्न आता मार्गी लागतील !
एकीकडे वडूज शहर मोठे होत असताना व तालुक्याचे प्रमुख शहर म्हणून ओळख असणाऱ्या वडूज ग्रामपंचायतीची ओळख नगरपंचायत म्हणून झाल्यास अनेक विकासांचे प्रश्न आपोआप मार्गी लागणार आहेत. केंद्राचा व राज्याचा थेट निधी उपलब्ध होऊन शहराचा विकासात्मक कायापालट होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना आहे.

Web Title: Alliance government's cautious steps!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.