खुनानंतर मृतदेह जाळून अस्थी विस्कटल्या नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST2021-01-10T04:30:35+5:302021-01-10T04:30:35+5:30

सातारा : आसले (ता. वाई) येथील ओमकार कैलास चव्हाण (वय ३०) या बेपत्ता युवकाचा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न ...

After the murder, the bodies were burnt and the bones were thrown into the river | खुनानंतर मृतदेह जाळून अस्थी विस्कटल्या नदीत

खुनानंतर मृतदेह जाळून अस्थी विस्कटल्या नदीत

सातारा : आसले (ता. वाई) येथील ओमकार कैलास चव्हाण (वय ३०) या बेपत्ता युवकाचा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून, ओमकारचा खून केल्यानंतर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्या अस्थी नदीत विस्कटून टाकल्या. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, हा प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रोहन राजेंद्र जाधव (वय १९), रोहित संजय घाडगे (२०), समाधान ऊर्फ चंप्या राजेंद्र शिंदे (१९), सलीम ख्वाजासाहेब शेख (१९, सर्व रा. भुईंज, ता. वाई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

ओमकार चव्हाण हा मूळचा जावळी तालुक्यातील करंदीमधील रहिवासी होता. तो कुटुंबीयासमवेत गेल्या अनेक वर्षांपूर्वी व्यवसायाच्या निमित्ताने आसले, ता. वाई येथे स्थायिक झाला. त्याचे महामार्गावर हॉटेल आहे. ४ जानेवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास पाचवड येथे जाऊन येतो, असे सांगून तो घरातून दुचाकीवरून निघून गेला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न आल्याने भुईंज पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी केली. ओमकारचा घातपात झाल्याच्या शक्यतेने स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे तत्काळ आपल्या हाती घेतली. भुईंज गावातील काही मुलांनी ओमकारचे अपहरण करून खून केल्याचे पोलिसांना गोपनीय माहितीद्वारे समजले. त्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला रोहन जाधव याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने इतरांचीही नावे सांगितली. कसलाही वेळ न दवडता पोलिसांनी उर्वरित तिघांनाही त्यांच्या घरातून अटक केली. चौघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. त्या दिवशी ओमकार दुचाकीवरून पाचवडला जात असताना वाटेत या टोळक्यांनी त्याला अडविले. त्याच्या दुचाकीवरून त्याचे अपहरण करून त्याला कृष्णा नदीच्या काठावर नेले. तेथे ओमकारचा लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने स्मशानभूमीत त्यांनी ओमकारचा मृतदेह जाळला. त्यानंतर त्याची राख गोळा करून नदीत इतरत्र विस्कटली. ओमकारच्या हातातील सोन्याची अंगठी व मोबाईल त्यांनी काढून घेतला. जेणेकरून हा प्रकार लूटमारीतून झाला, असे भासविण्याचा संशयितांनी प्रयत्न केला.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार ज्योतिराम बर्गे, उत्तम दबडे, आतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, रवी वाघमारे, प्रमोद सावंत, आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

चौकट : मुख्य सूत्रधारासह एक फरार!

ओमकारचे अनैतिक संंबंध होते. यातूनच आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून त्याचा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत ओमकार हा विवाहित असून, त्याला तीन मुले आहेत. या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सराईत आरोपी असून, त्याच्यासह अन्य एकजण सध्या फरार आहे. लवकरच हे दोघे हाती लागतील, असे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले.

आयकार्ड फोटो

०९ओमकार चव्हाण

Web Title: After the murder, the bodies were burnt and the bones were thrown into the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.