लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य जगाला आदर्शवत व प्रेरणादायी असून, युवा पिढीने याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे, असे मत वक्ते प्रा. नवनीत नंदकुमार यशवंतराव यांनी व्यक्त केले.
वाठार ( ता. कऱ्हाड) येथील कृष्णा फाऊंडेशनच्या जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे शिवजयंतीनिमित्त ऑनलाईन आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रा. नवनीत यशवंतराव बोलत होते.
यशवंतराव म्हणाले, विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, नेतृत्व व व्यवस्थापन कौशल्य विचारात घेणे गरजेचे आहे. अखंड हिंदुस्थानला एक आदर्श घालून देणारे छत्रपती शिवाजी महाराज आज व्यवस्थापनाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कळणे महत्त्वाचे आहे. ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरु’ हा संपूर्ण अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल कृष्णा फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ. विनोद बाबर यांचे त्यांनी आभार मानले. कोणतीही गोष्ट ज्यावेळेस घडते ती सहज घडत नाही. त्यावेळी त्याच्या पाठीमागील संघर्ष विचारात घेणे गरजेचे आहे. प्रास्ताविक नीशा जाधव यांनी केले तर पूजा माने यांनी आभार मानले.