‘अबीर’ला पक्षीय स्वरुप नको
By Admin | Updated: August 15, 2014 00:19 IST2014-08-14T23:21:46+5:302014-08-15T00:19:48+5:30
शिवेंद्रसिंहराजे : साताऱ्याच्या शांततेला कुठेही गालबोट लागू देऊ नका

‘अबीर’ला पक्षीय स्वरुप नको
सातारा : ‘माझ्याबाबत झालेल्या प्रकाराला फार महत्त्व देऊ नका. भावनेच्या भरात झालेला हा प्रकार आहे. सातारा शहराची शांतताप्रिय म्हणून ओळख आहे, त्याला कोठेही गालबोट लागू देऊ नका. माझ्यावर पडलेला अबीर हा विठ्ठलाचाच आशीर्वाद आहे,’ अशा शब्दांत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी झाल्या प्रकाराला बगल देत कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले.
येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, नगराध्यक्ष सचिन सारस, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, नगरसेवक विजय बडेकर, मुक्ता लेवे, हेमा तपासे, अंजली माने, वैशाली राऊत, नाशिर शेख आदी उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘धनगर समाजाचा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा होता. त्यासाठी धनगर समाजबांधवांनी मोर्चाला उपस्थित राहण्याची विनंती केली होती. त्यांना आरक्षण मिळावे, ही माझी भूमिका असल्याने मोर्चाला गेलो होतो. त्यावेळी एका युवकाने पुडीतील अबीर अंगावर टाकला.’
‘शासनाचा निषेध म्हणून तो टाकला असावा. धनगर समाजाशी आमचे आजही एकोप्याचे नाते आहे. त्यामुळे यातून चुकीचा अर्थ काढू नये. त्याचबरोबर त्यांच्या आरक्षण मागणीसाठीच्या उपोषणाला मी उपस्थित राहून पाठिंबा दिला होता,’ असेही ते यावेळी म्हणाले.
‘साताऱ्यातील ही घटना पाहता शासनकर्त्यांना विनंती आहे की, त्यांनी धनगर समाज व तरुणांच्या भावना समजावून घ्याव्यात. आरक्षणाच्या मागणीवर योग्य निर्णय घ्यावा. साताऱ्यातील या घटनेला कोणीही पक्षीय स्वरूप देऊ नये. कोणाला यामधून राजकीय फायदा मिळवायचा असेल त्यांना यापासून काहीही फायदा होणार नाही,’ असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.
‘तरुणांना चुकीच्या मार्गाला लावून काही विघ्नसंतोषी लोक अशा घटनांचा फायदा घेतात. कुणी राजकारणी तसे नियोजन करत असेल तर त्याचा काहीही फायदा होणार नाही,’ असेही त्यांनी कोणाचे नाव न घेता सुनावले. पत्रकारांनी विचारलेल्या तिरकस प्रश्नांना अत्यंत संयमाने उत्तरे देताना त्यांनी शेवटपर्यंत कुणावरही टिका केली नाही. (प्रतिनिधी)
स्वत: बाजारपेठेत फिरून दुकाने उघडली
स्वत: बाजारपेठेत फिरून दुकाने उघडली
शुक्रवारी स्वातंत्र्यदिन असल्यामुळे गुरुवारी बाजारपेठ बंद राहणे योग्य नाही, अशी भूमिका घेऊन शिवेंद्रसिंहराजेंनी ‘बंद’ मागे घेण्याचे आवाहन केले. स्वत: बाजारपेठेत येऊन त्यांनी दुकाने उघडण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. काही दुकानांची शटर्स तर त्यांनी स्वत: उघडली.
सोशल ‘चिडिया’ चिडीचूप
साताऱ्यात वातावरण तापले असताना गुरुवारी ‘सोशल मीडिया’ मात्र चिडीचूप राहिला. अर्थात, काही जणांनी रस्त्यात पेटविलेल्या टायरचे फोटो ‘सोशल मीडिया’वर टाकल्याचे दिसून आले; मात्र दरवेळी ज्या वेगाने अशा फोटोंचा प्रसार होतो, तसा यावेळी झाला नाही. आज ‘सोशल मीडिया’ वापरणाऱ्यांनी जबाबदारीचे भान राखल्याचे दिसून आले.
शुक्रवारी स्वातंत्र्यदिन असल्यामुळे गुरुवारी बाजारपेठ बंद राहणे योग्य नाही, अशी भूमिका घेऊन शिवेंद्रसिंहराजेंनी ‘बंद’ मागे घेण्याचे आवाहन केले. स्वत: बाजारपेठेत येऊन त्यांनी दुकाने उघडण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. काही दुकानांची शटर्स तर त्यांनी स्वत: उघडली.
सोशल ‘चिडिया’ चिडीचूप
साताऱ्यात वातावरण तापले असताना गुरुवारी ‘सोशल मीडिया’ मात्र चिडीचूप राहिला. अर्थात, काही जणांनी रस्त्यात पेटविलेल्या टायरचे फोटो ‘सोशल मीडिया’वर टाकल्याचे दिसून आले; मात्र दरवेळी ज्या वेगाने अशा फोटोंचा प्रसार होतो, तसा यावेळी झाला नाही. आज ‘सोशल मीडिया’ वापरणाऱ्यांनी जबाबदारीचे भान राखल्याचे दिसून आले.