संजय पाटीलकऱ्हाड : कोयना विभागात १९६७ साली ६.६ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला होता. त्यानंतर आजपर्यंत या विभागात एवढ्या मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला नसला तरी येथील ‘किर्णास’ भूकंपमापन वेधशाळेत आजअखेर एकूण सव्वा लाख धक्के नोंदले आहेत.महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती झाल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे भूकंपमापन वेधशाळा उभारण्यात आली. राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या या वेधशाळेत प्रादेशिक भूकंपांची नोंद घेतली जाते. वास्तविक येथे प्रादेशिकसह देशभरातील सर्वच भूकंप समजतात. मात्र, नोंद फक्त प्रादेशिक विभागातीलच घेतली जाते.वेधशाळेतील नोंदीनुसार गत ६१ वर्षात सव्वा लाखावर भूकंपांची नोंद झाली आहे. या भूकंपांचा केंद्रबिंदू कोयना तसेच वारणा खोऱ्यामध्ये आहे. मात्र, कोयना खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांपेक्षा वारणा खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. तसेच वारणा खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांची तीव्रताही जास्त असल्याचे त्या-त्या वेळच्या नोंदीवरून दिसून येते.
हेळवाकपासून दक्षिणेला वारणा खोरे
- कोयना नदी पाटण तालुक्यातील हेळवाकपर्यंत येऊन तेथून ९० अंशांमध्ये कऱ्हाडकडे वळते. तेथून दक्षिणेकडील भाग हा वारणा खोरे म्हणून ओळखला जाताे, तर उत्तरेकडे कोयना खोरे सुरू होते.
- मळे, कोळणे, पाथरपुंज, नाव, मोरगिरी खोरे, चांदोली, सिद्धेश्वर, चांदेल, पांढरपाणी यासह चांदोलीचा भाग वारणा खोऱ्यात येतो, तर कोयना खोऱ्याने सातारा जिल्ह्यातील बहुतांश भाग व्यापला आहे.
‘किर्णास’ का म्हणतात..?कोयनेला १९६७ साली विनाशकारी भूकंप झाला. त्यावेळी रशिया बनावटीचे ‘किर्णास’ हे त्याकाळचे अत्याधुनिक यंत्र कोयना वेधशाळेला देण्यात आले होते. त्या यंत्रावरूनच पुढे या वेधशाळेला ‘किर्णास’ हे नाव पडल्याचे सेवानिवृत्त संशोधन सहायक डी. एम. चौधरी यांनी सांगितले.
१९६३ ते मे २०२५ अखेर..
- १,१९,९२४ : ३ रिश्टर स्केलपेक्षा कमी (अतिसौम्य)
- १,६७२ : ३ ते ४ रिश्टर स्केल (सौम्य)
- ९६ : ४ ते ५ रिश्टर स्केल (मध्यम)
- ९ : ५ रिश्टर स्केलपेक्षा जास्त (तीव्र)
- १,२१,७०४ : आजअखेर नोंदलेले भूकंप
दहा वर्षांतील भूकंप
- २०१४ : ४०२
- २०१५ : २५३
- २०१६ : ५३
- २०१७ : ३५३
- २०१८ : ३१४
- २०१९ : ३३३
- २०२० : १५३
- २०२१ : १२८
- २०२२ : १३७
- २०२३ : ९६
- २०२४ : ७८
कोयनेच्या भूकंपमापन वेधशाळेत सर्वच भूकंपांची नोंद घेतली जाते. या वेधशाळेत मी पस्तीस वर्षे काम केले आहे. सौम्य तसेच मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के येथे सातत्याने जाणवतात. मात्र, गत तीन ते चार वर्षांत भूकंपांची संख्या आणि तीव्रताही कमी झाली आहे. - डी. एम. चौधरी, सेवानिवृत्त संशोधन सहायक