दुष्काळ निवारणासाठी आठ कोटी : चव्हाण
By Admin | Updated: July 13, 2014 22:52 IST2014-07-13T22:51:51+5:302014-07-13T22:52:09+5:30
पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळाचे सावट

दुष्काळ निवारणासाठी आठ कोटी : चव्हाण
कऱ्हाड : ‘सातारा जिल्ह्याची दुष्काळ आढावा बैठक आज, रविवारी घेतली. परिस्थिती चिंताजनक आहे. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आठ कोटी जिल्ह्यासाठी मदत जाहीर केली आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकारांना दिली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आज कऱ्हाड दौऱ्यावर असताना त्यांनी शासकीय विश्रामगृहावर दुष्काळाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री शशिकांत शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, तसेच सर्व आमदार, अधिकारी उपस्थित होते. सुमारे तीन तास ही आढावा बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री चव्हाण यांनी पत्रकारांना माहिती दिली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘राज्यात सर्वत्रच पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळाचे सावट आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यास वीजनिर्मितीवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. सातारा जिल्ह्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी दोन कोटी वनविभागाला, दोन कोटी जुने पाझर तलाव दुरुस्ती करण्यासाठी, तर चार कोटी इतर कारणांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करणार आहे. सध्या साखळी बंधाऱ्यांचा जिल्ह्यात चांगला प्रयोग झाला आहे. त्यामुळे पाणीपातळी सुधारण्यास मदत झाली आहे. परिणामी, त्या तालुक्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी मिटायला हातभार होणार आहे. आतापर्यंत साखळी बंधाऱ्यांसाठी आम्ही माण, खटाव, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांकडेच लक्ष दिले; पण यापुढच्या काळात जेथे जास्त पाऊस होतो, त्या तालुक्यातही साखळी बंधाऱ्यांचा प्रयोग करणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
२५ हजार हेक्टरवर तयार होणार चारा !
‘जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी २५ हजार हेक्टर जमिनीवर चारा तयार करण्यात येणार आहे. यंदा जिल्ह्यात अजिबात चारा टंचाई होऊ देणार नाही,’ असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
साखळी बंधाऱ्यांची बदनामी खपवून घेणार नाही !
‘दुष्काळी तालुक्यातील पाण्याची टंचाई दूर करण्याच्या हेतुने साखळी बंधाऱ्यांचा प्रयोग केला. मात्र, काहीजण या कार्यक्रमाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कामे चांगली झालीच पाहिजेत. त्यांची तक्रार आहे, तर चौकशी जरूर करू; पण जाणीवपूर्वक कोणी बदनामी करीत असेल तर ते खपवून घेणार नाही,’ असा इशारा मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिला.