सातारा जिल्ह्यातील १६० गावांना टँकरच्या ४२५ खेपा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:23 IST2019-04-28T23:23:09+5:302019-04-28T23:23:25+5:30
सातारा : जिल्ह्यात टंचाईची स्थिती अधिक गडद होत असताना सध्या १६० गावे आणि ७२३ वाड्यांसाठी १९१ टँकर सुरू आहेत. ...

सातारा जिल्ह्यातील १६० गावांना टँकरच्या ४२५ खेपा!
सातारा : जिल्ह्यात टंचाईची स्थिती अधिक गडद होत असताना सध्या १६० गावे आणि ७२३ वाड्यांसाठी १९१ टँकर सुरू आहेत. त्या माध्यमातून ४२५ खेपा पुरवाव्या लागत आहेत, तर तीन लाख नागरिकांना टँकरचा आधार असून, माणमधील सर्वाधिक ६७ गावे अन् ५२८ वाड्या या टंचाईच्या तडाख्यात सापडल्या आहेत.
माण तालुक्यातील मध्यम व लघु पाटबंधारेचे दहापैकी सहा तलाव पूर्णत: कोरडे पडले आहेत. सहा तलावांपैकी चारमध्ये मृतसाठा असल्याने तालुक्यातील जनतेला भीषण पाणीटंचाई भासत आहे. ९५ टँकरने १९७ टँकरच्या खेपाने ६७ गावे व ५२८ वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे, तर तालुक्यातील ४७ विहिरींचे अधिग्रहण करून पुरवठा सुरू असला तरी अनेक वाड्या-वस्त्यांवर टँकरच्या नियमानुसार फेऱ्या होत नसल्याने अनेकवेळा ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.
खटाव तालुक्यात शासनाने १४३ गावांपैकी १२७ गावांमध्ये टंचाई घोषित करून सर्व सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने ३९ गावांमध्ये ९५ खेपांद्वारे टँकर सुरू करून काही प्रमाणात ग्रामस्थांची तृष्णा भागविण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्यात २०६ स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असून, ७८ लघू नळ पाणीपुरवठा योजना, १,५५९ विंधन विहिरी, हातपंप, ८९ विद्युतपंप व ७१ साध्या विहिरींवरून पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना व साधने उपलब्ध आहेत.
कºहाड तालुक्यात लघुपाटबंधारे विभागाच्या लेखी ६१ पाझर तलाव आहेत. यामधील ४४ पाझर तलाव आटले आहेत. ४४ तलाव फेबु्रवारीच्या मध्यावरच कोरडे पडले असून, उर्वरित १७ तलावांत केवळ ५ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तालुक्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
जावळी तालुक्यात यंदाही भीषण पाणीटंचाई सुरू आहे. मेढा-केळघर रस्त्यावरील व डोंगराळ भागात पाणीटंचाई सुरू आहे. तालुक्यातील ५६ गावांमध्ये पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. सुमारे २० गावांचे टंचाई प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले आहेत. यापैकी फक्त चार गावांमध्ये टँकर सुरू केले आहेत. जावळीतील चाकरमानी दरवर्षी उन्हाळ्यात सुटीवर गावी येतात; मात्र यावर्षी गावी पाणीच नसल्याने चाकरमान्यांनी गावाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी बाजारपेठेवर परिणाम जाणवत आहे.
कोरेगाव तालुक्यात १३८ पैकी ८६ गावे प्रशासनाने टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. आॅगस्ट २०१८ पासून प्रशासनाने ग्रामस्थांच्या सहकार्याने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. सध्या २८ गावांना ३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
माण तालुक्याची तहान भागवतोय ढाकणी तलाव..
उरमोडीचे पाणी माण तालुक्यातील पिंगळी व ढाकणी तलावांमध्ये सोडल्याने काहीअंशी दुष्काळग्रस्तांची थोडी का होईना तहान भागू शकते. उरमोडीच्या पाण्याने गोंदवले खुर्द, लोधवडे, चव्हाणमामा व मणकर्णवाडीचा केटी वेअर भरण्यात आला आहे. सध्या तालुक्यात भीषण पाणीटंचाई असून, संपूर्ण तालुक्याची तहान एकमेव ढाकणी तलावातून भागवली जात आहे. तालुक्यातील एकमेव असणाºया फिडिंग पॉर्इंटवर अनेक टँकर भरण्यासाठी उभे असतात.