सातारा अन् कऱ्हाड तालुक्यात कोरोनाच्या ४० टक्के रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST2021-04-20T04:40:14+5:302021-04-20T04:40:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील कोरोना संकटाला वर्ष झाले असून आतापर्यंत ८२ हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ...

सातारा अन् कऱ्हाड तालुक्यात कोरोनाच्या ४० टक्के रुग्णांची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील कोरोना संकटाला वर्ष झाले असून आतापर्यंत ८२ हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक १९ हजार रुग्ण सातारा तालुक्यात तर कऱ्हाडमध्ये १३ हजारांवर स्पष्ट झाले आहेत. या दोन्ही तालुक्यांत बाधित आढळण्याचे प्रमाण ३९.८३ टक्के आहे. तर २०९२ मृत्यूपैकी ८९० हे या दोनच तालुक्यांतील आहेत. टक्केवारीत हे प्रमाण ४२.५४ आहे. या दोन्ही तालुक्यांतील रुग्ण आणि मृतांची टक्केवारी धडकी भरविणारी आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्या इतपत रुग्ण सापडत होते. मात्र, जून महिन्यानंतर कोरोना रुग्ण वाढीचा वेग झपाट्याने वाढला होता. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाचे रुग्ण दररोज ५०० ते ८००, ९०० दरम्यान वाढत होते. पण, ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर कोरोना वाढीचा वेग मंदावला. कधी १००, २०० फारतर ३०० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळून आले. मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णात हळू-हळू वाढ होत गेली. मार्चपेक्षा एप्रिल महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला. गेल्यावर्षी एकदाच १ हजाराच्यावर रुग्णसंख्या पोहोचली होती. मात्र, सध्या १ हजाराच्यावर रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे कोरोनाचा विस्फोट झाला आहे.
मागील दोन महिन्यांचा विचार करता फेब्रुवारीत २४९१ नवीन रुग्ण समोर आले होते. जानेवारीच्या तुलनेत ११०० रुग्णांची वाढ झाली होती. तर ३६ जणांचा कोरोनाने बळी घेतला होता. मृतांचा आकडाही १० ने वाढला होता. त्याचबरोबर फेब्रुवारीपेक्षा मार्च महिन्यात बाधित वेगाने वाढले. कारण, एका महिन्यात ६५४८ बाधित सापडले तर ५१ जणांचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारीचा विचार करता मार्च महिन्यात २४९० बाधित वाढले. तर मृतांची संख्या १५ ने वाढली.
एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर तर बाधितांचा आकडा १५ हजारांनी वाढला आहे. ही वाढ धक्कादायक आहे. कारण, गेल्या काही दिवसांत तर दिवसाला १ हजारांवर रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ ही एप्रिलमध्येच नोंद झाली आहे. तर २०० हून अधिक जणांचा बळी एप्रिलमध्ये कोरोनाने गेला आहे. ही आकडेवारी गंभीरपणे विचार करायला लावणारी आहे. त्यातच सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यात कोरोना बाधितांची नोंद आतापर्यंत ३३ हजारांजवळ पोहोचली आहे. म्हणजे आतापर्यंत रुग्ण सापडले, त्यामधील जवळपास ४० टक्के बाधित हे या दोन तालुक्यांतीलच आहेत. तसेच या दोन तालुक्यांतच कोरोना मृतांचा आकडाही विचार करायला लावणारा आहे. त्यामुळे हे दोन तालुके कोरोना विस्फोटाचे प्रमुख केंद्र बनल्याचे दिसून येत आहे.
चौकट :
तालुकानिहाय नोंद कोरोना आकडेवारी
तालुका बाधित मृत
सातारा - १९२३८ ५२७
कऱ्हाड - १३४०५ ३६३
फलटण - १००११ २१३
कोरेगाव - ७०७१ १८२
वाई - ६०९८ १६७
खटाव - ६५४३ १७६
खंडाळा - ५०२५ ८७
जावळी - ३६८८ ८१
माण - ४५६९ १३७
पाटण - ३२०३ १२७
महाबळेश्वर - २६७७ ३२
इतर - ४२६ ००
.....................................................