नायगाव-मांढरदेव रस्त्याला ३५ वर्षांचे ग्रहण

By Admin | Updated: December 17, 2014 23:04 IST2014-12-17T21:18:50+5:302014-12-17T23:04:26+5:30

शासनाच्या अनास्थेमुळे काम ठप्प : दोन्ही प्रेरणास्थळे जोडण्याची जनतेची मागणी

35 years of eclipse on the Naigaon-Mandhradev road | नायगाव-मांढरदेव रस्त्याला ३५ वर्षांचे ग्रहण

नायगाव-मांढरदेव रस्त्याला ३५ वर्षांचे ग्रहण

खंडाळा : पर्यटनातून राज्यविकास असे नवे धोरण नव्या शासनाने अंगीकारले आहे. मात्र, पर्यटन स्थळांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे साकारले गेले. येथूनच अवघ्या काही किलोमीटर अंतरावर महाराष्ट्राचे कुलदैवत मांढरदेवची काळूबाईचे प्रसिद्ध ठिकाण आहे. परंतु विद्येची देवता आणि कुलदेवता यांना एकाच वेळी पाहण्याचा योग मात्र राज्यातील लोकांच्या नशिबी नाही. केवळ शासनाच्या अनास्थेमुळे नायगाव ते मांढरदेव रस्त्याबाबत मार्ग निघत नाही. प्रतिवर्षी केवळ आश्वासनांच्या गर्ते अडकलेल्या या रस्त्यावर गेली ३५ वर्षे तोडगा न निघाल्यामुळे जनतेतून प्रचंड नाराजी आहे.
शिरवळहून नायगावमार्गे मांढरदेवला घाटरस्ता व्हावा, यासाठी खंडाळा तालुक्याचे तत्कालीन सभापती लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांनी प्रयत्न केले होते. त्यानुसार १९८० मध्ये या रस्त्याला शासनाने मंजूर दिली होती. त्यासाठी २७ लाखांचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले. त्यानुसार त्यावेळेचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी टोकन प्रोव्हिजनद्वारे टेंडर काढून दहा लाखांचा निधीही दिला होता.
मात्र, रस्त्याचे काम सुरू होऊ शकले नाही. १९८२ मध्ये या कामाचा पाठपुरावा करणारे सभापती लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांचे अपघाती निधन झाले व या कामाकडे शासनाचेही दुर्लक्ष झाले. त्यानंतर त्यांचे सुपुत्र नितीनकुमार भरगुडे-पाटील सभापती झाल्यावर या रस्त्याच्या कामाचा पुन्हा पाठपुरावा सुरू केला. खंडाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची या रस्त्यासाठीची मागणी गरजेची असल्याचे शासनाच्या लक्षात आणून दिले.
प्रतिवर्षी नायगाव येथे शासनातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती साजरा केला जातो. महाराष्ट्रातील लाखो लोक येथे येतात. दरवर्षी या रस्त्याची मागणी मंत्र्यांकडे करण्यात आली; मात्र दुर्लक्षित असलेला हा रस्ता अद्यापही होऊ शकलेला नाही. हा रस्ता पर्यटनासाठीच नव्हे तर, या मार्गावर येणाऱ्या जवळे, कवठे, लोहोम, झगलवाडी, धाडगेवाडी, लिंबाचीवाडी या गावांनाही जोडणारा आहे. यामुळे हा मार्ग होणे महत्त्वाचे आहे.
या रस्त्याची गरज ओळखून आमदार मकरंद पाटील यांनी २०१२ मध्ये पुन्हा या रस्त्याचा नव्याने सर्व्हे करून घेतला. या रस्त्याला निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केला, मात्र अजूनही या रस्त्याचे काम सुरू होऊ शकले नाही.
त्यामुळे शासनाची ही अनास्था दूर केव्हा होणार? आणि या रस्त्याचे प्रत्यक्षात काम होणार? असाच प्रश्न जनतेपुढे आहे. (प्रतिनिधी)

ज्ञानज्योती सावित्रीबार्इंचे जन्मगाव नायगाव व कुलदेवता मांढरदेवी ही दोन्ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. यांना जोडणारा रस्ता घ्यावा, ही गेल्या पस्तीस वर्षांची मागणी आहे. सहा ते दहा किलोमीटरच्या रस्त्याचे काम बाकी आहे. तीन जानेवारीला सावित्रीबार्इंची जयंती समारंभ साजरा करताना या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळावी व काम सुरू करावे. सावित्रीबाई फु ले यांना हेच खरे अभिवादन ठरेल.
-नितीन भरगुडे-पाटील,
माजी उपाध्यक्ष, जि. प. सातारा

उपाययाजनेची गरज
1 राष्ट्रीय महामार्गापासून केवळ सोळा किलोमीटरचा हा रस्ता आहे. त्यापैकी मांढरदेव डोंगरपायथ्यापर्यंतचा रस्ता झालेला आहे. त्यापुढील सहा किलोमीटरचा घाटरस्ता होणे बाकी आहे. यास शासनाने मंजुरी दिल्यास महाराष्ट्रातून येणारे पर्यटक, भाविकांना दोन्ही स्थळे एकाच वेळी पाहता येणार आहेत.
2 मांढरदेवला जाण्यासाठी पर्यटकांना व भाविकांना एकतर पुणे जिल्ह्यातील भोरमार्गे किंवा वाईमार्गे जावे लागते. मात्र, हा रस्ता झाल्यास तो सर्वात जवळचा व सुरक्षित मार्ग ठरणार आहे. शासनाने या रस्त्याला मंजुरी देऊन रखडलेला प्रश्न मार्गी लावावा, अशीच मागणी जनतेतून होत आहे.

Web Title: 35 years of eclipse on the Naigaon-Mandhradev road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.