३१५ विहिरींची कामे तत्काळ मार्गी लावावीत
By Admin | Updated: April 13, 2016 00:13 IST2016-04-12T22:03:26+5:302016-04-13T00:13:59+5:30
विजय शिवतारे : मुंबईतील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश

३१५ विहिरींची कामे तत्काळ मार्गी लावावीत
सातारा : ‘जिल्ह्यातील ३१५ प्रस्तावित विंधन विहिरींची कामे तत्काळ पूर्ण करण्यात यावीत, खासगी काम करणाऱ्या मशिनरी १८ एप्रिलपर्यंत ताब्यात घेऊन ही कामे हाती घ्या, टंचाई काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वांनी एकत्रित कामाला लागा,’ असे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सातारा जिल्ह्यातील टंचाई आढावा बैठक मुंबईत घेण्यात आली. या बैठकीमध्ये दुष्काळाशी लढण्यासाठी निर्णय घेण्यात आले. सर्व कामांच्या संदर्भात खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या, असेही त्यांनी बजावले. सर्वेक्षणात अयोग्य आढळलेल्या विंंधन विहिरींची यादी लोकप्रतिधींना देणे, विंधन विहिरींचा पाईप वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविणे, उर्वरित विंधन विहिरींचे सर्वेक्षण करून जी आय पाईप वाढविण्यासंदर्भात कारवाई करणे, टँकर फिडिंग पॉइंटची देयके टंचाईमधून देण्यात यावीत, टँकरची मागणी होताच सात दिवसांच्या आत टँकर चालू करावा, उपसा सिंचन योजनेची देयके टंचाईमधून देण्यात यावीत आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले. दुष्काळाशी लढताना हयगय करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
सभेला विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, आ. शंभूराज देसाई, आ. आनंदराव पाटील, आ. नरेंद्र पाटील, आ. महादेव जानकर, आ. प्रभाकर घार्गे, दिलीप येळगावकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)