दुपारी ३ वाजेपर्यंत सगळे निकाल येणार हाती !
By Admin | Updated: August 6, 2015 00:40 IST2015-08-06T00:36:06+5:302015-08-06T00:40:22+5:30
ग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींचा आज लागणार निकाल

दुपारी ३ वाजेपर्यंत सगळे निकाल येणार हाती !
सातारा : जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींसाठी उभ्या असणाऱ्या ८ हजार ७०४ उमेदवारांचे भविष्य मंगळवारी मतदान मशीनबंद झाले होते. जिल्हाभरात ६ लाख ९४ हजार ५१९ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला असून, गुरुवारी (दि. ६ आॅगस्ट) मतमोजणी होणार आहे. निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींची संख्या मोठी असल्याने उमेदवार किती निवडून येतात आणि किती ग्रामपंचायती ताब्यात राहतात, यावरच स्थानिक नेत्यांचे भविष्य अवलंबून राहणार असल्याने त्यांची धाकधूक वाढली असून दुपारी ३ वा. पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे निकाल हाती येणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरणच भलतेच ढवळून निघाले आहे. अनेक गावांमध्ये राष्ट्रवादी व काँगे्रस या पक्षांतर्गतच प्रस्थापितांना शह देण्याची व्यूव्हरचना आखली गेली होती. अनेक वर्षे गावचा कारभार चालविणाऱ्या स्थानिक नेते मंडळींना चेक देण्याच्या हालचाली या निवडणुकीच्या निमित्ताने झाल्या. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी व त्याखालोखाल काँगे्रस या दोन पक्षांची सत्ता आहे. या दोन्ही पक्षांचा वारू रोखण्यासाठी शिवसेना व भाजप हे दोन पक्ष रिंगणात उतरले असून, जागोजागी तिरंगी निवडणुकीचे चित्र पाहायला मिळू लागले आहे.
सातारा तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींपैकी अलवडी, निसराळे, सायली, वेचले, अंबवडे खुर्द, भोंदवडे, वावरदरे, कामथी, वळसे, यवतेश्वर, विजयनगर, आष्टे या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटांना यश आले. पण, इतर २९ ग्रामपंचायतींमध्ये टस्सल होणार आहे. यापैकी खेड, क्षेत्रमाहुली, डोळेगाव, संगममाहुली, संभाजीनगर, विलासपूर या ग्रामपंचायतींसाठी राष्ट्रवादीअंतर्गत गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. या गावांत दोन्ही राजेंचे समर्थक एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. वाईमध्ये ७१ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून, बावधन, पसरणी, उडतारे, बोपेगाव, शिरगाव, अभेपुरी या गावांत आमदार मकरंद पाटील व किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या स्थानिक नेतेमंडळींचे भविष्य टांगणीला लागले आहे.
कऱ्हाडातील ९८ ग्रामपंयतींपैकी राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या तासवडे, विरवडे, करवडी, कोडोली, गोळेश्वर, नांदलापूर, चिखली, गोटे, शेरे, किरपे, केसे, शिवडे, इंदोली, पाल, शिरवडे, बनवडी, वारुंजी, गोटेवाडी, काले, भरेवाडी, येरवळे, हणबरवाडी, शेणोली, हजारमाची, वाघेर, विंग, बेलवडे बुद्रुक, पेरले, उंब्रज, कार्वे, सवादे या गावांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. आनंदराव पाटील, माजी आ. विलासकाका उंडाळकर, धैर्यशील कदम, आ. बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच धुरळा उडवून दिला. माण तालुक्यात शेखर गोरे यांनी बंधू आमदार जयकुमार गोरे यांना खुले आव्हान दिले असून, आंधळी सोसायटीच्या निवडणुकीतील चित्र पुन्हा पाहायला मिळत आहे. पाटण तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांची ताकद यानिमित्ताने जोखली जाणार आहे. कोरेगावात ४९ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तारगाव, किन्हई, धामणेर, ल्हासुर्णे, दुदी या गावांतील राजकीय वातावरण अजूनही तंग असून, आ. शशिकांत शिंदे, काँगे्रसचे अॅड. विजयराव कणसे यांच्या कार्यकर्त्यांनी ताकद आता कळणार आहे. जावळीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, मोहन शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या कार्यकर्त्यांनाही यानिमित्ताने बळ दाखविण्याची संधी मिळाली आहे.फलटणमध्ये ७८ ग्रामपंचायतींमध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, काँगे्रसचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या गटांची ताकद पाहायला मिळणार आहे. खटावमध्ये ८८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून, चंद्रकांत पाटील, आमदार जयकुमार गोरे, शिवसेनेचे रणजित देशमुख यांच्यापैकी कोण बाजी मारतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. खंडाळा तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींमध्ये आ. मकरंद पाटील, माजी आ. मदन भोसले, शिवसेनेच्या शारदा जाधव, हणमंतराव साळुंखे, आनंदराव गायकवाड यांच्या ताकदीची चुणूक दिसून येणार आहे.
९३ ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी
महाबळेश्वरातील २४ पैकी १६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, आ. मकरंद पाटील व जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भिलारे यांनी महाबळेश्वरात सत्ता अबाधित राखण्यासाठी जोरदार हालचाली केल्या. (प्रतिनिधी)
- कऱ्हाड : तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी सरासरी ८५ टक्के मतदान झाले. मतदानानंतर गुरुवारी दि. ६ आॅगस्ट रोजी मतमोजणी होणार असून, मतमोजणी केंद्रावर कडक पोलीस सुरक्षाव्यवस्था उभारण्यात आली आहे.
- तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी झालेल्या मतदानानंतर गुरुवारी (दि. ६ ) येथील भेदा चौक या ठिकाणी असलेल्या शासकीय रत्नागिरी गोदाममध्ये २०० कर्मचाऱ्यांमार्फत मतमोजणी केली जाणार आहे. प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी नऊ वाजता प्रारंभ केला जाणार असून, वॉर्डनिहाय पद्धतीने मतमोजणी केली जाणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
- ९३ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र शेळके, निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांच्याकडून मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतमोजणी संदर्भात सूचना केल्या आहेत. मतमोजणी केंद्रावर उमेदवार अथवा त्यांचा प्रतिनिधी दोघांपैकी एकास उपस्थित राहता येणार आहे.
- मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मतमोजणी केंद्र परिसरात अतिरिक्त पोलीस कर्मचारी, शिपाई यांची नेमणूक करण्यात आली आहे.