जिल्ह्यात तीन महिन्यांत २८ आत्महत्या; प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST2021-05-03T04:33:42+5:302021-05-03T04:33:42+5:30

सातारा : गत दीड वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये ६९ जणांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. माणसाच्या अपेक्षा ...

28 suicides in three months in the district; The proportion decreased | जिल्ह्यात तीन महिन्यांत २८ आत्महत्या; प्रमाण घटले

जिल्ह्यात तीन महिन्यांत २८ आत्महत्या; प्रमाण घटले

सातारा : गत दीड वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये ६९ जणांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. माणसाच्या अपेक्षा वाढल्या. त्या पूर्ण करताना होणारी दमछाक, अपेक्षापूर्ती न झाल्याने माणसांमध्ये नैराश्याची भावना वाढत जाऊन आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

जिल्ह्यात २०१९ मध्ये सुमारे २६८ जणांनी आत्महत्या केल्या, तर २०२० या कोरोना संकटात अर्थचक्र बंद पडल्याने अनेक उद्योग बंद पडले. नोकऱ्या गेल्या. आर्थिक नुकसान झाले. जवळचे कोरोनाने दगावल्याने माणसे व्यसनाधीन झाली. परिणामी माणसात प्रचंड नैराश्य येऊन स्वतःला असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. नकारात्मक विचार मनात येऊ लागले. त्यातून अनेकांनी आत्महत्या केल्या.

जिल्ह्यात २०२० मध्ये आत्महत्येचे प्रमाण थोडेफार घटले. या वर्षात माणसाला कोरोनाने घेरले. त्यातून वर्षभरात सुमारे १७३ जणांनी आत्महत्या केल्या. आता २०२१ च्या प्रारंभीच्या कालावधीत अनेक जण स्वतःला सावरत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा डोके वर काढले; पण गतवर्षीचा अनुभव पाहता आता हे संकट फक्त आपल्या एकट्यावरच नाही. सारेच अडचणीत असल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण होत आहे. त्यामुळे गत दोन वर्षांतील आत्महत्येचे सरासरी प्रमाण गत तीन महिन्यांत कोरोनाच्या संकटामुळे आत्महत्येचे कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. जानेवारी ते मार्च २०२१ अखेरपर्यंत २८ जणांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले आहे.

कोट:

संकट माझ्या एकट्यावर नाही

कोरोना संकटात मी एकटा अडचणीत नाही, तर सारेच अडचणीत आहेत, अशी भावना प्रत्येकाच्या मनात सध्या निर्माण होत आहे. वस्तुस्थितीची जाणीव करून सकारात्मक विचार करून लोक मार्ग काढत आहेत. या कोरोनाच्या काळामध्ये मानसोपचार तज्ज्ञ अथवा समुपदेशकाकडून उपचार घेणे, कौटुंबिक संवाद, सकारात्मक छंद वाढविणे अशामुळे आत्महत्येचे प्रमाण कमी होऊ शकते.

डॉ. एच. डी. पाटील, मानसोपचार तज्ज्ञ, सातारा

चौकट :

कोरोना संकटात तेरा आत्महत्या

जिल्ह्यात कोरोनाचे संकट महाभयंकर ओढावले आहे. सारेजण संकटात सापडले आहेत; पण गत वर्षभरापासून आर्थिक नुकसानीत पुन्हा उभे राहण्याची उमेद संपल्याच्या नैराश्यातून जिल्ह्यात ११ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. याशिवाय इतरही आत्महत्या झाल्या; पण त्यासाठी ठोस कारण पोलिसांच्या दप्तरी नोंद नाही.

चौकट :

२०१९ ला झालेल्या आत्महत्या २६८

२०२०- १७३

२०२१ जानेवारी ते मार्च - २८

Web Title: 28 suicides in three months in the district; The proportion decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.