कऱ्हाडकरांच्या नशिबी ‘चोवीस तास’ मृगजळ!
By Admin | Updated: November 25, 2015 00:31 IST2015-11-25T00:11:43+5:302015-11-25T00:31:36+5:30
योजनेचे काम ढेपाळले : जीवन प्राधिकरणाकडून पाचव्यांदा मुदतवाढ; काम कधी पूर्ण होणार --कऱ्हाड फोकस

कऱ्हाडकरांच्या नशिबी ‘चोवीस तास’ मृगजळ!
संतोष गुरव -- कऱ्हाड आदरणीय पी. डी. पाटील यांनी कऱ्हाड शहरात पाण्याची उत्तम सोय व्हावी या उद्देशाने कऱ्हाड शहरात भूयारी गटार योजना कार्यान्वित केली. त्याचबरोबर मलकापूरप्रमाणे कऱ्हाड शहरातील लोकांनी चोवीस तास पाणीपुरवठा व्हावा म्हणून चोवीस तास पाणी पुरवठा योजना अंमलात आणली. मात्र, अद्यापही कऱ्हाडकरांबरोबर पालिकेची ही पाणीपुरवठा योजना चोवीस तासाच्या कामाच्या प्रतिक्षेत आहे.बाराडबरी परिसरात सुरू असलेले चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी जीवन प्राधिकरणाकडून अनेकवेळा मुदतवाढ मागविण्यात आली आहे. यातच नुकत्याच झालेल्या कऱ्हाड पालिकेच्या वादळी मासिक सभेमध्ये प्राधिकरणास सहाव्यांदा मुदतवाढ देण्याचा ठराव संमत करण्यात आला.
कऱ्हाड येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पालिकेने चोवीस तास पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. या योजनेला २००६ मध्ये मंजुरी मिळाली. तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पुढाकाराने केंद्राच्या योजनेत ऐनवेळी कऱ्हाडच्या पाणी पुरवठा योजनेचा समावेश करत मंजुरी मिळविण्यात आली.
योजना मंजुरीचे प्रशासकीय कामकाज पूर्ण झाल्यानंतर तब्बल चार वर्षानंतर २००९ मध्ये संबंधित ठेकेदाराला कार्यादेश देण्यात
आला.
त्यावेळी काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षाची मुदत देण्यात आली होती. मात्र, सुरुवातीपासूनच योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याने दोन वर्षामध्ये वीस ते तीस टक्केच योजनेचे काम पूर्ण झाले.
योजनेच्या कामास जास्त अवधी लागणार असल्याचे सांगत पुन्हा २०११ मध्ये पहिल्यांदा मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर संबंधित ठेकेदारांकडून मुदतवाढ मागण्यात आली असता त्यास पालिकेकडूनही वारंवार मुदतवाढ देण्यात आली.
मुदतवाढीचा आकडा आता सहावर पोहोचला आहे. पालिकेकडून या पाणीपुरवठा योजनेकडे चोवीस तास लक्ष दिले गेले नसल्याने या योजनेची अशी अवस्था झाली असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते.
अकार्यक्षम प्रशासन, नुसती आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी तसेच मुदतवाढ करणारा ठेकेदार यांच्यामुळे या योजनेचे काम अपूर्ण राहिल्याचे सांगितले जाते. कऱ्हाड शहरातील बाराडबरी परिसरात चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या टाकीचे काम केले जात आहे.
मात्र, ठेकेदारास योजनेचे बिल पालिकेकडून वेळेवर दिले जात नसल्याने काम संथगतीने केले जात असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगितले जात आहे.
चोवीस तास ‘कसले’ काम !
बाराडबरी परिसरात पाणीपुरवठा योजनेचे काम हे चोवीस तास सुरू असल्याचे काही नगरसेवकांकडून यापूर्वी सांगितले जात होते. मात्र, नुकत्याच झालेल्या पालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी पक्षातील नगरसेवकांनी प्राधिकरणाच्या कामाबाबत संताप व्यक्त केला असता. प्राधिकरणाच्या कामाची सद्यस्थिती समोर आली.
पालिकेच्या सभेत प्राधिकरणावर ताशेरे
चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या अपूर्ण कामाबाबत पालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या सभेमध्ये यापूर्वीही दोनवेळा प्राधिकरणाच्या कारभाराबाबत ताशेरे ओढण्यात आले आहेत.
सहाव्यांदा मुदतवाढ
कऱ्हाड येथील चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे अपूर्ण असलेले काम पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत तब्बल सहाव्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. योजनेच्या कामाचे बिल वेळेवर मिळत नसल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
कऱ्हाड पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेला २००६ मध्ये पहिल्यांदा मंजुरी मिळाली त्यावेळी योजनेचा खर्च हा ४३ कोटी धरण्यात आला होता. मात्र, आता या योजनेच्या कामास विलंब झाला असल्याने हा खर्च वाढला असून, तो ५७ कोटींच्या घरात पोहचला आहे.