साताऱ्यात सैनिकांसाठी १५ लाखांची तरतूद!
By Admin | Updated: February 26, 2016 00:47 IST2016-02-26T00:47:27+5:302016-02-26T00:47:50+5:30
पालिका अर्थसंकल्प : माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना मिळाला दिलासा

साताऱ्यात सैनिकांसाठी १५ लाखांची तरतूद!
सातारा : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सातारा नगरपालिकेने आपल्या अर्थसंकल्पात तब्बल १५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही तिप्पट वाढ करून तरतूद केल्याने सैनिक वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सैनिकांच्या कल्याणासाठी स्वनिधी खर्च करणारी महाराष्ट्रातील सातारा ही एकमेव पालिका ठरली आहे.
राष्ट्रपती शौर्यपदक प्राप्त माजी सैनिक व माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांच्या प्रयत्नामुळे पालिकेला आपल्या अर्थसंकल्पात सैनिक कल्याणासाठी निधीची तरतूद करावी लागली. २०१२-१३ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी संभाजीराव कडू-पाटील यांनी सातारा पालिकेने बजेटमध्ये सैनिक कल्याणासाठी निधीची तरतूद करण्याचा आदेश दिला होता. माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठी हा निधी खर्च करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या; पण पालिकेने एका रुपयाचीही तरतूद केली नव्हती. शंकर माळवदे यांनी कडू-पाटील यांच्यानंतर आलेले जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांना लेखी पत्र देण्यात आले.
पालिकेचे २०१३-१४ चे आर्थिक अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे गेले असताना त्यांनी ते रोखले. माजी सैनिकांसाठी आर्थिक तरतूद करण्याचे आदेश त्यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्यानंतर ही तरतूद खास बाब म्हणून करण्यात आली. त्यानंतर अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. या निधीच्या माध्यमातून सैनिकांचे हॉस्पिटल, मिलिट्री कॅन्टीन, मुला-मुलींचे वसतिगृह येथे सोयीसुविधा पुरविण्यात आल्या होत्या.
दरम्यान, ही तरदूही कमी पडत असल्याने माळवदे यांनी पालिकेकडे १५ लाखांची तरतूद करण्याची विनंती केली होती. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेला या निधीची तरतूद करण्याची सूचना केली. त्यानुसार २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात १५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, माजी सैनिक रुग्णालयाचे कर्नल एम. एम. चव्हाण व मिलिटरी कॅन्टीनचे इन्चार्ज कर्नल शरद केंजळे यांनी पालिकेने केलेल्या तरतुदीबाबत समाधान व्यक्त केले. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी पालिकेच्या निधीच्या माध्यमातून सैनिक कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)