जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार

By Admin | Updated: May 24, 2016 00:54 IST2016-05-23T23:14:27+5:302016-05-24T00:54:53+5:30

जयंत पाटील : सांगलीत बैठक; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला उपदेशाचा डोस

Zilla Parishad will contest elections on its own | जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार

जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार

सांगली : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांची परीक्षा जवळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने आतापासूनच कामाला लागावे. या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. जनतेचे प्रश्न हाती घेऊन युवक राष्ट्रवादी महिलांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. जो यात कमी पडेल, त्याला पदावरून हटवू, अशा शब्दात सोमवारी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना डोस दिला.
आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक व जिल्हा, तालुका कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोमवारी जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी जयंत पाटील बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, आमदार सुमनताई पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरूणअण्णा लाड, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महिला आघाडीच्या अध्यक्षा उषा दशवंत, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद लाड उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक महत्त्वाची आहे. त्यासाठी युवक, महिला व तालुका कार्यकारिणीने पूर्ण ताकदीनिशी काम केले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस हा जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष आहे. हा दबदबा आपल्याला कायम राखायचा आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांवेळी काहीजण पक्षातून बाहेर गेले. नेते सोडून गेले असले तरी, कार्यकर्ते पक्षासोबत आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न हाती घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. आपण स्वत: ३१ मेनंतर जत, तासगाव, मिरज तालुक्याचा दौरा करणार आहोत. आपण सत्तेत नाही, तर विरोधक आहोत, याची जाणीव ठेवून कार्यकर्त्यांनी भूमिका पार पाडावी. केवळ मनात विरोध असून चालणार नाही, तो रस्त्यावर आणला पाहिजे.
सरकारच्या हातून चुका होत असताना युवक, महिलांनी हातावर हात ठेवून चालणार नाही. संघर्षाची भूमिका स्वीकारली पाहिजे. जतमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांनी प्रत्येक अन्यायाविरोधात संघटित होण्याची गरज आहे. येत्या महिन्याभरात तालुकाध्यक्ष, युवक अध्यक्ष व महिला अध्यक्षांनी प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात बैठका घ्याव्यात. तेथील अडचणी, कार्यकर्त्यांचे मत यांचा विचार करून आपला अहवाल जिल्हाध्यक्षांकडे द्यावा. पक्ष सोडून गेलेल्यांना पर्याय शोधावा. यात जो कोणी कमी पडेल, त्याला पदावरून हटविले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी तालुका, जिल्हा कार्यकारिणीतील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, सुरेश पाटील, रवींद्र बर्डे, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी, सचिव मनोज भिसे, शंकरराव पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

भाजपने डांगोरा पिटू नयेनुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकीतील यशाचा भाजपकडून डांगोरा पिटला जात आहे. पण आसाम वगळता इतर राज्यात भाजपचे पानिपत झाले आहे. तामिळनाडू, केरळ, पेद्दुचरी, पश्चिम बंगाल या राज्यात भाजपला एक दोन जागा मिळाल्या आहेत. उलट केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत निर्भेळ यश मिळू शकलेले नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगाविला.

महापालिकेला कानपिचक्या
सांगलीत एका सहा वर्षाच्या बालिकेवर कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाला. या घटनेचा संदर्भ देत जयंत पाटील यांनी महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या. सहा वर्षाची बालिका मृत्युमुखी पडते, अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. नागरी वस्तीत अशा घटना घडतात, त्या शोभनीय नाहीत, असा चिमटाही त्यांनी काढला.
आर. आर. असते तर!
वाळव्याचे माजी सभापती रवींद्र बर्डे यांनी बैठकीत दुष्काळाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यापूर्वीही सांगली जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. पण मंत्रिमंडळात आर. आर. पाटील, जयंत पाटील होते, म्हणून सांगलीच्या जनतेला दिलासा मिळाला होता. आताच्या भाजप सरकारने दुष्काळात केवळ घोषणांचा पाऊस पाडला आहे. प्रत्यक्षात एकही काम केलेले नाही. आज आर. आर. पाटील असते तर, महाराष्ट्र दणाणून सोडला असता, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Zilla Parishad will contest elections on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.